युएईतून 900 भारतीय कैद्यांची सुटका होणार
युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद यांचा मैत्रीपूर्ण-मानवतावादी निर्णय
वृत्तसंस्था/ दुबई
भारत आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) यांच्यातील संबंधांमध्ये आणखी एक सकारात्मक पाऊल दिसून येत आहे. युएई सरकारने 900 हून अधिक भारतीय कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. सुटलेल्या कैद्यांची यादी अबू धाबी येथील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे. यूएई सरकारने त्यांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त (ईद अल-इत्तेहाद) मानवतावादी आणि मैत्रीपूर्ण कारणास्तव तुरुंगात असलेल्या 900 हून अधिक भारतीय नागरिकांना सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
युएईचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी कैद्यांची सुटका करतानाच त्यांच्या शिक्षेचा भाग म्हणून लावण्यात आलेला आर्थिक दंडही माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. याचा अर्थ कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक भारातून मुक्तता मिळणार आहे. गेल्यावर्षी 27 नोव्हेंबर रोजी यूएईच्या अध्यक्षांनी ईद अल-इत्तेहादच्या आधी 2,937 कैद्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती जारी केली होती. त्यानंतर कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया गतिमान झाली होती.
भारत-युएई संबंध बळकट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून सोमवारी युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी भारताचा अधिकृत दौरा केला होता. गेल्या 10 वर्षांतील हा त्यांचा पाचवा दौरा होता. तसेच युएईचे अध्यक्ष म्हणून त्यांचा तिसरा अधिकृत दौरा होता. त्यांच्या दौऱ्यादरम्यान धोरणात्मक संरक्षण भागीदारी पूर्ण करण्यासाठी आशयपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली होती. तसेच त्यांनी पंतप्रधानांशी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचार विनिमयही केला होता. 2026 मध्ये भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या यशासाठी युएईने पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.