रोज पंचगंगेत 82 दशलक्ष लिटर सांडपाणी
कोल्हापूर / संतोष पाटील :
कोल्हापूरची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणाऱ्या पंचगंगेत रोज 82.09 दशलक्ष लिटर (एम.एल.डी.) सांडपाणी विनाप्रक्रिया थेट मिसळते. कोल्हापुरात 6 लाख 67 हजार आणि इचलकरंजीतील 3 लाख 91 हजार तसेच इतर 17 गावांतील नागरिकांच्या आरोग्यासाठी मैली होणारी पंचगंगा घातक ठरत आहे. राज्य शासनाने 30 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आल्याने पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी कागदावरील योजनांवरुन प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे जाण्याची वेळ आल्याचे संकेत आहेत.
या अहवालानुसार, पंचगंगा नदी प्राधान्य चारमध्ये आहे. यातील जैव रासायनिक ऑक्सिजन मागणी (बीओडी) आणि मलद्रव्य क्लोलिफॉर्मची पातळी मानकांपेक्षा जास्त आहे. सांडपाण्यामुळे नदीचे पाणी पिण्यासाठी तर अयोग्य बनले आहेच याशिवाय ते स्नानासह शेतीसाठीही योग्य राहिले नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
कोल्हापूर महापालिका : दररोज 149.1 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते, यापैकी फक्त 106.7 पाण्यावर प्रक्रिया केली जाते. याचा अर्थ, रोज 42.4 दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीत सोडते.
इचलकरंजी महापालिका : दररोज 40 एमएलडी सांडपाणी तयार होते, यापैकी केवळ 20 एमएलडीवर प्रक्रिया होते. उर्वरित 20 एमएलडी सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत जाते.
नदीकाठावरील प्रमुख 17 गावे : 19.69 एमएलडी सांडपाणी तयार होते, परंतु यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने या 17 गावांसह इतर लहान 39 गावातील सांडपाणी थेट नदीत जात आहे.
- प्रदूषणाचे परिणाम
पाण्याची गुणवत्ता : नदीच्या पाण्यातील बीओडी (ऑक्सिजनची मागणी) 1.8-5.2 मिग्रा/लिटर आहे. 3 मिग्रा/लिटरच्या मानकापेक्षा जास्त आहे. मलद्रव्य क्लोलिफॉर्मची संख्या 5-94 एमपीएन /100 एमएल यामुळेच नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचे अंश असल्याचा हा पुरावा मानला जातो.
पर्यावरणीय नुकसान : नदीकाठावरील जैवविविधता धोक्यात आली आहे. मासे आणि इतर जलचर प्राण्यांचे प्रमाण कमी होत आहे.
- तोकड्या उपाययोजना
कोल्हापूर महापालिकेने 76, 4 आणि 17 एमएलडीचे सांडपाणी प्रक्रिया सुविधा (एसटीपी) केंद्रे उभारली आहेत. इचलकरंजीत 20 एमएलडीचे एकच एसटीपी आहे. मोठ्या 17 आणि लहान 39 गावांत सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे एकही केंद्र, उपकरण नाही.
- नाल्यातून प्रदूषण
पंचगंगा नदीत 21 प्रमुख नाले मिसळतात. ज्यामध्ये इचलकरंजीतील काळा ओढा (32 एमएलडी), जयंती नाला (65 एमएलडी) आणि दुधाळी नाला (24 एमएलडी) क्षमतेचा आहे. या नाल्यांमधील बीओडी आणि सीओडीची पातळी अत्यंत जास्त आहे (उदा. काळा ओढा : बीओडी 132 मिग्रा / लिटर, सीओडी 397 मिग्रा-fिलटर) याशिवाय अनेक साखर कारखाने, उद्योगांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जाते.
- प्रस्तावित उपाययोजना
नवीन एसटीपी उभारणी : कोल्हापुरात 6, 9, 15 आणि 19.50 एमएलडीचे चार एसटीपी तर इचलकरंजीत 18 एमएलडीचा एक एसटीपी प्रस्तावित आहे. यासाठी 120 कोटी 77 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसह घनकचरा व्यवस्थापनासाठी 461 कोटी 42 लाखांची निधी राखीव असून 2028 पर्यंत अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. एमपीसीबीने स्थानिक संस्थांना सांडपाणी निर्मितीवर एक पैसा/लिटर दंड लावण्याचे निर्देश दिले आहेत.