Satara Crime | साताऱ्यात पोलिसांची 'मोबाईल रिकव्हरी' मोहिम! १६ लाखांचे ८० फोन हस्तगत; नक्की कसं शोधलं जाळं?
सातारा शहर पोलिसांची डीबी पथकाकडून उल्लेखनीय कारवाई
सातारा -सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतून फेब्रुवारी व मार्च महिन्यात नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल १६ लाख रुपये किंमतीचे ८० स्मार्ट मोबाईल शोधून काढण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण व सीईआयआर पोर्टलच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.डी. बी. पथकाने सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मोबाईल धारकांशी सातत्याने संपर्क साधत चिकाटीने शोध मोहीम राबवली. त्यातून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश आले. दि. १२ मे रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या उपस्थितीत हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले.
सातारा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
सातारा हे जिल्ह्यातील मुख्य शहर असून मोठ्या बाजारपेठा, बसस्थानक परिसर, तसेच बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणावर ये-जा करणाऱ्या नागरिकांमुळे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने विविध ठिकाणांहून मोबाईल परत मिळबत नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रशांत मोरे, रणजित कुंभार, ओमकार डुबल, यशवंत घाडगे, राकेश घाडगे, रामदास भास्करवाड यांनी सहभाग घेतला.