छत्तीसगडमध्ये वीज कोसळल्याने 5 विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू
शालेय परीक्षा देऊन परतत असताना काळाचा घाला
वृत्तसंस्था/ राजनांदगाव
छत्तीसगडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. राजनांदगाव जिल्ह्यातील जोरातराई येथे वीज कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला. या नैसर्गिक आपत्तीत पाच शाळकरी विद्यार्थ्यांसह अन्य तीन युवकांना जीव गमवावा लागला. मुसळधार पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी ते एका झाडाखाली विसावले असता आभाळातून वीज कोसळली. जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख ऊपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना नियमानुसार भरपाई देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
छत्तीसगडमधील सोमाणी पोलीस स्थानक हद्दीतील जोरातराई गावात सोमवारी दुपारी गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला. याचा फटका शाळेतून परतत असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना बसला. यादरम्यान झाडावर वीज पडल्याने पाच मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. राजनांदगावचे जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी या घटनेला दुजोरा दिला असून एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सर्व मुले अकरावीत शिकत असून ती परीक्षा देऊन परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.