मंत्रालयजवळ भीषण अपघातात 8 भाविक ठार
मृत चिक्कमंगळूर जिल्ह्यातील : राघवेंद्र स्वामींच्या दर्शनाला जाताना काळाची झडप
बेंगळूर : मंत्रालयम येथील राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी बोलेरो जीपमधून जाणाऱ्या चिक्कमंगळूर जिल्ह्यातील भाविकांवर काळाने झडप घातली. आंध्रप्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयजवळ कल्लुदेकुंट येथे गुरुवारी पहाटे 4 च्या सुमारास मालवाहू बोलेरो जीप आणि काँक्रिट मिक्सर वाहन यांच्या भीषण अपघातात 8 भाविक ठार झाले. कुमार (वय 50), दिपिका (वय 42), वीणा (वय 42), सुनील (वय 40), पुट्टम्मा (वय 55), लोलाक्षी, यशोदा (वय 60) आणि बेली (वय 5) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. चिक्कमंगळूरमधील 21 जण बोलेरो वाहनातून मंत्रालयकडे निघाले होते.
कल्लुदेवकुंट येथे समोरून येणाऱ्या काँक्रिट मिक्सर वाहनाची बोलेरो जीपला धडक बसली. या अपघातात 6 जण जागीच ठार झाले तर दोघांचा इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 13 जखमींना एमिगनूर आणि कर्नूल येथील शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे मंत्रालयकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच मंत्रालय पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. काँक्रिट मिक्सर वाहनचालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला.