पावसाळ्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, Konkan Railway मार्गावर 676 कर्मचाऱ्यांचा 'वॉच'
पावसाळी हंगामासाठी रेल्वे प्रशासन सज्ज, 3 नियंत्रण कक्ष 24 तास राहणार कार्यरत
खेड : कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने उपाययोजनांची आखणी केली आहे. पावसाळ्यात 676 कर्मचाऱ्यांचा रेल्वे मार्गावर दिवस-रात्र ‘वॉच’ राहणार आहे. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगावमध्ये 24 नियंत्रण कक्ष कार्यरत राहतील. असुरक्षित ठिकाणी 24 तास जागता पहारा असेल.
9 स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डींग पर्जन्यमापक बसवण्यात येणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी 6 ठिकाणी वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेतील त्या-त्या विभागाच्या सर्व यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
यंदा पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी 15 जूनपासून करण्यात येणार आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा वेग मंदावणार आहे. अतिवृष्टीत दृश्यमानता कमी झाल्यास ताशी 40 कि.मी.च्या वेगाने रेल्वेगाड्या धावणार असून तशा सूचना लोकोपायलटना देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलदरित्या हालचाल करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहेत. रत्नागिरी, वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर, आपत्कालीन वैद्यकीय मदतीच्या व्यवस्थेसह अपघात निवारण वैद्यकीय व्हॅनही सज्ज ठेवण्यात येणार आहे. वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी आदी 9 प्रमुख स्थानकांमध्ये देखभाल वाहने (आरएमव्ही) तैनात ठेवण्यात येणार आहेत.
नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास 15 मिनिटात वाहतूक सुरू करण्यासाठी तयार असलेली अपघात निवारण गाडी वेर्णा येथे तैनात असेल. पाण्याचा वेग 100 मि.मी. पेक्षा जास्त असेल तेव्हा रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केली जाईल आणि पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ती पुन्हा सुरू केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कॅचवॉटर ड्रेनेजची व्यापक स्वच्छता आणि मार्गावरील कटिंग्जची तपासणी करण्यात आली आहे.
नियंत्रण कार्यालय/स्थानकाशी आपत्कालीन संपर्क साधण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोबाईल फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पायलट व गार्डस्ना वॉकी-टॉकी प्रदान करण्यात आल्या आहेत. पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी काली नदी (माणगाव आणि वीरदरम्यान), सावित्री नदी (वीर आणि सापे वामणे) आणि वाशिष्ठी नदी (चिपळूण आणि कामथे) या प्रमुख पुलांवर पूर इशारा प्रणाली कार्यरत करण्यात येणार आहे.
वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी बसवली यंत्रणा
वाऱ्याच्या वेगाचे निरीक्षण करण्यासाठी पानवल व्हायाडक्ट (रत्नागिरी आणि निवसर दरम्यान), मांडवी पूल (थिविम आणि करमाळी), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्ना) आणि शरावती पूल (होन्नावर आणि माणकी) या चार ठिकाणी वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोलमन, वॉचमन, लोकोपायलट गार्ड आणि नियंत्रण कार्यालयातील इतर फील्ड देखभाल कर्मचाऱ्यांमध्ये तत्काळ संपर्क साधण्यासाठी दर 1 कि.मी. अंतरावर आपत्कालीन कम्युनिकेशन (ईएमसी) सॉकेट्स बसवण्यात येणार आहेत.