61 हजार ‘जॉब लेटर्स’चे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण
18 वा रोजगार मेळावा : तरुणांना संधीचे द्वार उघडल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रोजगार मेळाव्यात 61,000 उमेदवारांना व्हर्च्युअल पद्धतीने नोकरणी नियुक्तीपत्रांचे (जॉब लेटर) वाटप केले. गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि इतर विभागांमध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या. 18 व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत देशभरातील 45 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या आभासी भाषणात पंतप्रधानांनी तरुणांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. देशभरातील महिला आता स्टार्टअप्सचे नेतृत्व करत असल्याने महिला स्वयंरोजगाराचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी 22 ऑक्टोबर 2022 रोजी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. यापूर्वी शेवटचा रोजगार मेळावा 24 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. सरकारी भरती मिशन मोडवर कशी करता येईल हे सांगण्यासाठी रोजगार मेळावा सुरू करण्यात आला. आता रोजगार मेळावा एक संस्था बनली आहे. भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देश अनेक व्यापार करारांवर स्वाक्षरी करत असल्यामुळे अनेक संधी मिळतील, असा दावा पंतप्रधानांनी केला.
भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमची व्याप्ती वाढत आहे. देशातील दोन लाख नोंदणीकृत स्टार्टअपमध्ये 21 लाख तरुण काम करत आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. भारतावरील वाढत्या जागतिक विश्वासामुळे अनेक शक्यता निर्माण होत आहेत. 2025 मध्ये दुचाकी वाहनांची विक्री 2 कोटींपेक्षा जास्त झाली. कमी झालेल्या उत्पन्न कर आणि जीएसटीमुळे हा फायदा झाला आहे. वाहन क्षेत्राच्या विस्तारीकरणातूनही देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
स्टार्टअपमध्ये महिलाही आघाडीवर
शनिवारच्या रोजगार मेळाव्यात 8,000 हून अधिक महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. महिला स्वयंरोजगाराचा दर 15 टक्क्यांनी वाढला आहे. आज अनेक स्टार्टअपमध्ये महिला संचालक आहेत. महिला अनेक ग्रामीण रोजगार क्षेत्रांचे नेतृत्व करत आहेत. सध्या वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात, देशाच्या प्राधान्यक्रम बदलत आहेत. तुम्हाला सतत स्वत:ला अपग्रेड करावे लागेल. आता वेगाने बदलणाऱ्या दुनियेत टिकून राहण्यासाठी नवे तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.