श्रीलंकेत 60 भारतीयांना अटक
► वृत्तसंस्था / कोलंबो
श्रीलंकेत सायबर गुन्हे केल्याच्या प्रकरणी 60 भारतीयांना अटक करण्यात आली आहे. राजधानी कोलंबोच्या उपनगरांमध्ये श्रीलंका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये त्यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी या उपनगरांमध्ये एकाच वेळी अनेक धाडी घालण्यात आल्या. संगणकाच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे रॅकेट या उपनगरांमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली.
ग्राहकांना आधी पैशाचे अमिष दाखवून, त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून मोठ्या रकमांच्या ठेवी घ्यायच्या आणि नंतर तो पैसा गिळंकृत करायचा अशी या सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती होती. एका ठेवीदाराने तक्रार केल्याने या प्रकरणाचा भांडाफोड झाला. संशयितांकडून 157 मोबाईल फोन्स आणि 57 लॅपटॉप्स जप्त करण्यात आले आहेत. सायबर गुन्हे करणाऱ्या काही टोळ्या कोलंबोनजीकच्या उपनगरांमध्ये वास्तव्य करुन असल्याची माहिती होती.