छत्तीसगडमध्ये 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान
दंतेवाडा-नारायणपूर सीमेवर चकमक : उशिरापर्यंत शोधमोहीम
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमध्ये नारायणपूर आणि दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शुक्रवारी चकमक झाली. एसटीएफ, डीआरजी कोब्रा आणि नारायणपूर टीमच्या संयुक्त कारवाईमध्ये सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या संघर्षात आणखीही जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अधिकृत सूत्रांकडून त्याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती.
पूर्व बस्तर परिसरात शुक्रवारी चकमक सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत सुरक्षा यंत्रणांच्या हाती मोठे यश लागले होते. सहा नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतरही पुढे संघर्ष व शोधमोहीम सुरूच होती. नारायणपूर, दंतेवाडा आणि विजापूर सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तथापि, या ताज्या चकमकीत किती नक्षलवादी मारले गेले आहेत याची माहिती मिळालेली नाही. उच्च पोलीस अधिकारी संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव रॉय यांनी सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईला दुजोरा दिला आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाईअंतर्गत केंद्र आणि राज्याकडून सतत मोहिमा राबविल्या जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी 31 मार्च 2026 ही तारीख निश्चित केली आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईमुळे नक्षलवादी चिंतेत असून सतत आत्मसमर्पण करत आहेत.
व्यापक शोधमोहीम
दहशतवाद्यांचा एक अ•ा उद्ध्वस्त केल्यानंतर सर्व फौज पुढील जंगलभागात रवाना झाली होती. सुरुवातीला नक्षलविरोधी मोहिमेवर नारायणपूर आणि दंतेवाडा येथील जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) यांच्या संयुक्त पथकाला नक्षलविरोधी कारवाईसाठी पाठवण्यात आले होते. पोलीस अधिकारी बरेच नक्षलवादी मारले गेल्याचा दावा करत आहेत परंतु त्यांनी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या स्पष्टपणे सांगितली नाही. या भागात यापूर्वीही मोठी चकमक झाली होती. येथे सुरक्षा दलाने एसकेझेडसी सदस्य नितीसह 38 जणांना ठार मारले होते. निती हा माड परिसराचा कणा मानला जात होता. ऑक्टोबर 2024 मध्ये फोर्सला हे मोठे यश मिळाले होते.
नक्षल निर्मूलन मोहिमेबाबत बैठक
दरम्यान, निर्मूलन मोहिमेअंतर्गत राजधानी रायपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक होत आहे. शुक्रवारी ही बैठक मेफेअर हॉटेलमध्ये सुरू होती. या बैठकीमध्ये छत्तीसगडसह मध्यप्रदेश, ओडिशा, तेलंगणाचे डीजीपी, केंद्रीय सुरक्षा दल आणि गुप्तचर अधिकारी सहभागी झाले होते. नक्षलवाद्यांवर चालवल्या जाणाऱ्या कारवाईला आणखी तीव्र करण्यावर आणि सीमावर्ती राज्यांमधून त्यांना घेराव घालण्यावर चर्चा झाली. गुप्तचर यंत्रणेच्या आधारे ही कारवाई करण्यासाठी आयबीच्या गुप्तचर अहवालाचाही प्रामुख्याने विचार केला जाईल, असे नक्षलविरोधी मोहिमेशी संबंधित अधिकृत सूत्रांनी सांगितले.