बिहारमध्ये 24 तासात 6 पूल जमीनदोस्त
सर्वोच्च न्यायालयात पोहोचले प्रकरण : याचिकेत चार जिल्ह्यांचा विशेष उल्लेख
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारमध्ये मागील 24 तासांत 6 पूल जमीनदोस्त झाले आहेत. बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या वाढत्या घटनांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेद्वारे बिहार सरकारला संपूर्ण संरचनात्मक ऑडिट करणे आणि कमकुवत पूलांची ओळख पटविण्यासाटी एक उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिका मागील 15 दिवसांमध्ये 9 पूल कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आली आहे. भारतात बिहार हे सर्वाधिक पूरग्रस्त राज्य आहे. पूल कोसळल्याने पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि विश्वसनीयतेबद्दल चिंता निर्माण होत असल्याचे याचिकेत म्हटले गेले आहे.
तज्ञ समितीकडून सर्व पूलांची विस्तृत तपासणी आणि निरंतर देखरेखीची जबाबदारी निश्चित केली जावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेत अररिया, सिवान, मधुबनी आणि किशनगंज जिल्ह्यांसमवेत नदी क्षेत्रांनजीकचे अनेक पूल कोसळल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बिहारमध्ये पूरप्रभावित क्षेत्र 68,800 चौरस किलोमीटर इतके आहे. एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या हे प्रमाण 73.06 टक्के आहे. याचमुळे बिहारमध्ये पूल कोसळण्याच्या अशा घटना अधिक विध्वंसक ठरू शकतात, असे याचिकाकर्त्याकडून म्हटले गेले आहे.