6 राज्यांच्या गृह सचिवांसह बंगालच्या डीजीपींना हटवले
लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाची कारवाई
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृह सचिवांना हटवले आहे. एवढेच नाही तर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे डीजीपी आणि मिझोराम व हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांनाही सध्याच्या पदावरून दूर केले आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
निवडणूक आयोगाने बीएमसी म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून या कारवाईचे कोणतेही कारण तात्काळ देण्यात आले नसले तरी लोकसभा निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
निवडणूकविषयक कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंबंधी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून काही सूचना करण्यात आल्या होत्या. ज्यांनी एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा स्वत:च्या मूळ जिल्ह्यात सेवा बजावत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून सर्व राज्य सरकारांना देण्यात आले होते. देशातील 543 लोकसभेच्या जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.