पाचवी, आठवी, नववीची बोर्ड परीक्षा रद्द
उच्च न्यायालयाचा आदेश : अकरावीचाही समावेश : राज्य सरकारची पिछेहाट
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्याचा अभ्यासक्रम अनुसरलेल्या शाळांमधील पाचवी, आठवी, नववी आणा अकरावी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाच्या धर्तीवर परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला होता. परीक्षेसंबंधी जारी करण्यात आलेली अधिसूचना राज्य सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे राज्य सरकारची पिछेहाट झाली असून यावेळी या वर्गांसाठी बोर्डाची परीक्षा होणार नाही.
राज्य सरकारने पाचवी आणि आठवी इयत्तांप्रमाणेच यंदापासून नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठीही बोर्डाची परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी केली होती. 11 मार्चपासून या परीक्षांना प्रारंभ होणार होता. मात्र, परीक्षेला आक्षेप घेत खासगी शाळा व्यवस्थापन संघटनेने (रुप्सा) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायमूर्ती रवी व्ही. होसमनी यांच्या एकसदस्यिय पीठाने निकाल जाहीर केला असून पाचवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या पब्लिक परीक्षांची अधिसूचना रद्द केली आहे.
राज्य सरकारने यापूर्वी राज्य अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळांमधील पाचवी, आठवी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील मूल्यांकनाऐवजी राज्यस्तरीय बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. नववी आणि अकवीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावी परीक्षेविषयी असणारे दडपण कमी होईल, असे शालेय शिक्षण आणि साक्षरता खात्याचे मंत्री मधू बंगारप्पा यांनी सांगितले होते. त्यानुसार राज्य शालेय शिक्षण-साक्षरता खात्याने 6 आणि 9 ऑक्टोबर 2023 रोजी शिक्षण कायद्यांतर्गत दोन परिपत्रके जारी करून बोर्ड स्तरावरील परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी केली होती.
याला आव्हान दिलेल्या रुप्सा संघटनेने शिक्षण खात्याचे परिपत्रक केवळ सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना लागू आहे. तो अभ्यासक्रमाचा भाग नाही. तथापि, सरकारने बोर्ड परीक्षेसाठी लर्निंग रिकव्हरी अभ्यासक्रमातून प्रश्नावली तयार केल्याचे म्हटले आहे. खासगी शाळेतील मुलांना लर्निंग रिकव्हरी अभ्यासक्रमातील प्रश्नांना उत्तर देणे कठीण आहे. त्यामुळे बोर्डस्तरीय परीक्षा सर्व मुलांना लागू करू नये, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. याचिकाकर्त्यांच्यावतीने के. व्ही. धनंजय, एस. सुदर्शन व अनिरुद्ध व्ही. कुलकर्णी यांनी केला.
सरकारच्या वकिलांनी युक्तिवाद करताना, लर्निंग रिकव्हरी हा देखील अभ्यासक्रमाचा भाग आहे. मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये सकारात्मक वाढ करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला आहे. प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न नाहीत. त्यामुळे बोर्ड परीक्षेसाठी रिकव्हरी अभ्यासक्रमातील प्रश्न वापरणे योग्य आहे. त्यानुसार परीक्षा घेण्याची संधी दिली जावी, असे मत मांडले.