‘वॅलेट’ घोटाळ्यात 5 हजार कोटी लुबाडले
वृत्तसंस्था / गुरुग्राम
हरियाणातील एका ऑन लाईन पेमेंट कंपनीने आपल्या ग्राहकांची 5 हजारा कोटी रुपयांची लुबाडणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या कंपनीने एक पेमेंट अॅप विकसीत केले होते. या अॅपच्या माध्यमातून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे या कंपनीच्या ‘ऑन लाईन वॅलेट’मध्ये हजारो गुंतवणूकदारांनी आपले पैसे गुंतविले होते. ग्राहकांना कॅशबॅक हमीही देण्यात आली होती. तथापि, नंतर कंपनीने ग्राहकांच्या नकळत गाशा गुंडाळला आणि हजारो लोकांची फसवणूक झाली.
आमिषे दाखवून फसवणूक
ही कंपनी प्रथम प्रीपेड पेमेंट सुविधा पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत झाली होती. टॉकचार्ज असे तिचे नाव होते. प्रारंभी या कंपनीने ग्राहकांना लाखो रुपयांचा कॅशबॅक दिला होता. त्यामुळे त्या मोहापोटी असंख्य गुंतवणूकदारांनी आपली कष्टाची कमाई किंवा निवृत्तीनंतर मिळालेली मोठी रक्कम या कंपनीत गुंतविली होती. तथापि, आता या सर्वांवर कपाळाला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.
टप्प्याटप्प्याने फसवणूक
प्रथम कंपनीने ग्राहकांना ‘ई वॅलेट’ पर्याय दिला. त्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांना वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात कॅशबॅक देण्यास प्रारंभ केला. 2017 पासून 2023 पर्यंत सारेकाही अलबेल होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार कंपनीकडे आकृष्ट झाले आणि कंपनीकडे प्रचंड पैसा जमा झाला. नंतर 2023 पासून कंपनीने 20 टक्के रक्कम सुलभता शुल्क म्हणून आकारण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून फसवणुकीचा प्रारंभ झाला. कंपनीने तोपर्यंत ग्राहकांचा विश्वास कमावला असल्याने प्रारंभी कोणालाही काय होत आहे, हे लक्षात आले नाही. जानेवारी 2024 पासून कंपनीच्या माध्यमातून कोणतेही पेमेंट विक्रेत्यांना होईनासे झाले. त्यामुळे गुंतवणूकदारांना जाग आली. तथापि, नंतर कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळेनासा झाल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आता या प्रकरणाची चौकशी होत आहे. तथापि, ग्राहकांना पैसे मिळतील याची शाश्वती नाही.
सावधानता आवश्यक
थोड्या रकमेच्या गुंतवणुकीवर मोठा लाभ किंवा परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या अशा ऑनलाईन किंवा ऑफलाईन कंपन्यांपासून सावध राहण्याची आवश्यकता या फसवणुकीतून सिद्ध झाली आहे. मोठ्या परताव्याच्या मोहापायी सारे पैसे घालविलेल्या ग्राहकांवर आता अक्षरश: रडण्याची वेळ आली आहे. हा इतरांसाठी मोठा धडा असल्याचे तज्ञांचे मत आहे. घरबसल्या श्रीमंत होण्याचा मोह टाळणे आणि अमिषांना बळी न पडले हाच यावर उपाय आहे.