उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीत 5 जण ठार
केदारनाथ मार्गावर ढगफुटीसदृश परिस्थिती : यात्रेला तात्पुरती स्थगिती, 200 भाविक अडकले
वृत्तसंस्था /केदारनाथ
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर ढगफुटीसदृश परिस्थिती अतिवृष्टीमुळे निर्माण झाली असून 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 भाविक मार्गावर विविध स्थानी अडकलेले आहेत. उत्तराखंडमध्ये सध्या अनेक स्थानी अतिवृष्टी होत आहे. हरिद्वार येथे पावसामुळे एक घर वाहून गेल्याने आस मोहम्मद आणि नगमा ही दोन बालके मृत झाली. तसेच अन्य नऊ जण जखमी झाले असून काहीजण बेपत्ता असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. थाटी खेड्यात 3 घरे महापुरात वाहून गेली असून तेथे साहाय्यता कार्य हाती घेण्यात आले आहे.
केदारनाथच्या यात्रेसाठी मार्गक्रमणा करणाऱ्या भाविकांना भीमबाली गढवाल येथे थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. यात्रामार्गावरील पायवाट वाहून गेल्याने पुढच्या मार्ग धोकादायक बनला आहे. या स्थानी राष्ट्रीय आपत्तीनिवारण प्राधिकरणाचे पथक पोहचले असून अडकलेल्या भाविकांना सेवा पुरवली जात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी आपत्तीनिवारण विभागाच्या सचिवांशी चर्चा करुन परिस्थितीची माहिती घेतली. चार धाम यात्रा मार्गाच्या स्थितीची सातत्याने पाहणी करण्यात येत असून यात्रेकरुंना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना करण्यात येत आहेत, अशी माहिती गढवाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.