45 बंडखोर कोणाचा खेळ बिघडविणार ?
सध्या राजस्थान विधानसभा निवडणुकीकडे राजकीय विश्लेषकांचे विशेष लक्ष लागून राहीले आहे. कारण मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या अन्य तीन राज्यांपेक्षा राजस्थानात बंडखोर उमेदवारांचे प्रमाण जास्त आहे. येथे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचे मिळून तब्बल 45 बंडखोर उमेदवार मैदानात आहेत.
ही संख्या उरलेल्या तीन राज्यांमधील बंडखोरांपेक्षाही जास्त भरते. राजस्थानात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्या बंडखोरांची संख्या जवळपास सारखीच आहे. तसेच राजकीय दृष्ट्या राजस्थानचे जे चार भाग पडतात, त्या सर्व भागांमध्ये या बंडखोरीची लागण दोन्ही पक्षांना झालेली दिसून येते. विशेषत: काँग्रेसमध्ये अद्यापही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गट आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पायलट यांचा गट यांच्यात विस्तव जात नसल्याने बंडखोरी या पक्षात अधिक तीव्र असलेली दिसून येते. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या सूचीवर अधिक पगडा गेहलोत यांचा दिसून येतो. परिणामी, सचिन पायलट गटाचे अनेक इच्छुक नाराज असल्याचे बोलले जाते. राजस्थान काँग्रेसने वरकरणी दोन गटांमधील वादाचा इन्कार केला असला तरी खासगीत असे गट असल्याचे मान्य केले जाते.
भाजपमध्येही बंडखोरी
भाजपमध्येही बंडखोरीची लागण झाली आहे. सध्या ती विशेष तीव्र दिसत नसली तरी किमान 12 बंडखोर चेवाने निवडणूक लढविताना दिसून येत असल्याने पक्षात काहीशी चलबिचल आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंडखोरांना कारवाईचा इशारा दिला असला तरी, काही बंडखोरांनी तो मनावर घेतलेला नाही. तथापि, मतदार सूज्ञ असून तो बंडखोरांना दूर ठेवेल असा विश्वास भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना वाटताना दिसत आहे.