अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा टाळले समन्स
ईडीला पत्र पाठवून दिला ‘जबाब’
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा प्रवर्तन निदेशालयाचे समन्स टाळले आहे. निदेशालयाला (ईडी) त्यांची दिल्लीत गाजलेल्या मद्यधोरण घोटाळ्यात चौकशी करायची आहे. याच प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया सध्या कारागृहात आहेत.
ईडीने पाठविलेलाr नोटीस बेकायदेशीर आहे. त्यामुळे मी प्राधिकरणासमोर उपस्थित राहणार नाही. मात्र, मी चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे, असे स्पष्ट करणारे पत्र केजरीवाल यांनी ईडीला पाठविल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी पत्रकारांना दिली. भारतीय जनता पक्षाने केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ज्याअर्थी केजरीवाल वारंवार समन्स टाळत आहेत, त्याअर्थी त्यांच्याकडे लपविण्यासारखे काहीतरी आहे, असा टोला पक्षाने लगावला आहे.
हे केवळ राजकारण
आपल्याला ईडीने या प्रकरणात का समन्स दिले आहे, हे स्पष्ट पेलेले नाही. आपण आरोपी आहोत की, साक्षीदार हे समन्सवरून स्पष्ट होत नाही. हे संपूर्ण मद्य धोरण घोटाळा प्रकरण असत्य असून ते केवळ राजकीय सूडबुद्धीपोटी निर्माण करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यापासून आपल्याला रोखण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने आपल्या विरोधात रचलेले हे कटकारस्थान आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे म्हणणे आहे.
आज्ञापालन हेच काम
सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या आज्ञांचे पालन करणे, हे एकच काम आहे. आपल्याला पाठविलेली नोटीस बेकायदेशीर आहे, हे ईडीला नेमकेपणाने माहीत आहे. पण ते सत्य सांगू शकत नाहीत. कारण त्यांना केंद्र सरकारचा रोष ओढवून घ्यायचा नाही, अशीही टिप्पणी केजरीवाल यांनी केली आहे.