बेळगाव जिल्ह्यात वर्षभरात 42 बालविवाह
154 बालविवाह रोखण्यात यश
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एप्रिल 2024 ते मार्च 2025 दरम्यान 42 बालविवाहांची नोंद झाली आहे. बालविवाहाचे हे वाढते प्रमाण चिंताजनक ठरणारे आहे. जिल्हा बाल संरक्षण विभागातर्फे उपलब्ध अहवालानुसार एकूण 196 बालविवाह करण्याचा प्रयत्न झाला. त्यापैकी 154 बालविवाह रोखण्यात यश आले. 22 प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला असून 66 प्रकरणे बाल कल्याण समितीकडे पुढील कारवाईसाठी सोपविण्यात आली आहेत.
ज्या समाजामध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे, त्यापैकी कुरुब समाजामध्ये सर्वाधिक 37 बालविवाहांची नोंद झाली आहे. अनुसूचित जमातीमध्ये 35, लिंगायतमध्ये 26 व अनुसूचित जातीपैकी 25 बालविवाहांची नोंद झाली आहे. मुस्लीम समाजामध्ये 17 बालविवाह करण्याचा प्रयत्न झाला. बेळगाव तालुक्यात एकूण 23 बालविवाहांची नोंद झाली आहे. गोकाकमध्ये 22, हुक्केरीमध्ये 18, सौंदत्ती व रामदुर्ग येथे प्रत्येकी 17, रायबाग व अथणीमध्ये प्रत्येकी 15 व चिकोडी येथे 10 बालविवाहांची नोंद झाली.
याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी सी. एस. सुखश्री यांच्या मते बालविवाह रोखण्यासाठी आम्ही सतत धडपड करत आहोत. बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यावर आमचा भर आहे. बालविवाहाचे प्रमाण पूर्णत: संपेपर्यंत आम्ही प्रयत्न करीत राहू. स्पंदना या संस्थेच्या सुशिला व्ही. यांच्या मते आमच्याकडे सातत्याने बालकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची प्रकरणे दाखल होत असतात. त्यामध्ये बालविवाहाच्या तक्रारीसुद्धा येतात. आमच्याकडे आलेल्या तक्रारी त्वरित बालकल्याण खात्याला कळवितो. परंतु सरकारी पातळीवर व प्रामुख्याने महिला व बालकल्याण खात्याने अधिक सक्षम होणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.