For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणी खणीतून उपसला 413 डंपर गाळ

05:56 PM Jul 29, 2025 IST | Radhika Patil
इराणी खणीतून उपसला 413 डंपर गाळ
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

क्रशर चौक येथील इराणी खणीतून तब्बल 413 टन गाळ उपसा करण्यात आला आहे. यातून तब्बल 3100 क्यूबेक लिटर म्हणजेच 1100 टन गाळ काढला असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. चार वर्षानंतर पहिल्यांदाच गाळ उपसा केला आहे. येथील दोन्ही खणी गाळमुक्त झाल्याने यंदाही गणेशविसर्जन करण्यास सज्ज झाल्या आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी इराणी खण मोलाची कामगिरी बजावत आहे. गेल्या सहा वर्षात घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या मिळून सुमारे 5 लाखांहून अधिक गणेशमूर्ती याठिकाणी विसर्जित झाल्या आहेत. यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवात इराणी खणीचा सिंहाचा वाटा राहिला आहे. घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती याठिकाणी विसर्जित केल्या जातात. यामध्ये 21 फुटांच्या गणेशमूर्तीही विसर्जित केल्या जातात. यामुळे खण पूर्ण क्षमतेने भरलेली असते. गेली अनेक वर्षे गाळ उपसला नसल्याने खण काठोकाठ भरली होती. आता गाळ काढल्यामुळे पाणीपातळी खाली गेली आहे.

Advertisement

इराणी खण आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या खणीतून गाळ काढण्यासाठी हायपॉवर डोजर वापरण्यात आले होते. यामध्ये एक 30 फूट बकेट आणि दुसरा 60 फूट बकेटच्या डोजरने गाळ उपसला. यासाठी 30 लाख रूपयांची निविदा काढण्यात आली होती. सद्यस्थितीत खण रिकामी झाली असल्याचे दिसून येते. खणीतील गाळ उपसल्यामुळे खणीतील नैसर्गिक स्त्रोत खुले झाले आहेत.

  • ऐन पावसाळ्यातच गाळ उपसा

यंदा मे महिन्यात पावसाला सुरूवात झाली. त्यातच खणीतून गाळ उपसण्याच्या कामाला 16 जूनला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला. दीड महिना याचे काम सुरू होते. मार्च महिन्यातच कामाला सुरूवात केली असती खण स्वच्छ होण्यास आणखी हातभार लागला असता.

  • पर्यावरणपूरक विसर्जनास चांगला पर्याय

दरवर्षी शहर, उपनगरासह ग्रामीण भागातूनही सार्वजनिक मंडळे, घरगुती गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातात. पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यास चांगला पर्याय आहे. यामध्ये शहरासह कळंबा, पाचगाव, फुलेवाडी, आर. के. नगर, पीरवाडी आदी परिसरातील भाविक गणेश विसर्जन करतात.

  • खणीच्या संवर्धनाची गरज

इराणी खणीसह याठिकाणी आणखी दोन खणी आहेत. महापालिकेकडून दरवर्षी याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. याठिकाणी रात्रीच्यावेळी मद्यपींचा वावर असतो. खणीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्या जातात. यावर कारवाई करून खणीचे संवर्धन केले पाहिजे.

  • खणीतील कारंजा बंद

सुमारे पाच वर्षापूर्वी लाखो रूपये खर्चून इराणी खणीमध्ये कारंज्या बसविला होता. याला आकर्षक विद्युत रोषणाई केल्याने खणीच्या सौंदर्यात भर पडली होती. मात्र, गेल्या वर्षीपासून हा कारंजा बंद ठेवण्यात आला आहे. हा कारंजा पुन्हा सुरू व्हावा, अशी, मागणी नागरिकांतून होत आहे.

  • इराणी खण स्वच्छ

दीड महिना खणीतून गाळ काढण्याचे काम सुरू होते. यंदा इराणी खण पुर्णपणे गाळमुक्त होऊन स्वच्छ झाली आहे. जवळपास 413 डंपर गाळ उपसण्यात आला आहे. सध्या खणीची पाणीपातळी कमी आहे. यामध्ये इतर ठिकाणाहून पाणी भरले जाणार आहे. यंदाही गणेशविसर्जनासाठी खण सज्ज आहे.
                                                                          - महादेव फुलारी, उपशहर अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका

Advertisement
Tags :

.