विधवांना देणार 4 हजार रुपये मानधन
एससी, एसटी, ओबीसीबांधवांमध्ये योजनांबाबत जागृती करणार : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या मानधनात होणार वाढ,मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा येत्या दोन महिन्यांत
पणजी : विधवा महिलांचे जीवन हे एकाकी असे असते. त्या विधवा झाल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतात. त्यांना आधार देण्याच्या हेतूने आणि मदत म्हणून समाजकल्याण खात्यामार्फत राज्यातील विधवा महिलांना प्रत्येकी महिना चार हजार रुपये मानधन दिले जाईल, अशी घोषणा समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. गृहआधार योजनामार्फत मिळणारा लाभ या योजनेशी जोडला जाणार असून, हा लाभ घेणाऱ्या विधवा महिलांची मुले 21 वर्षाखालील असतील त्यांनाच हा लाभ मिळणार असल्याचे ते सभागृहात म्हणाले. समाजकल्याण खाते, पुरातत्त्व खाते व नदी परिवहन खात्याच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला मंत्री फळदेसाई यांनी उत्तरे दिली.
समाजामध्ये जी विषमता आहे, ती दूर करण्याचे समाजकल्याण खात्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेद्वारे देण्यात येणारी अनुदान रक्कम वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. महिन्याची रक्कम 2 हजारावरून 5 हजार करण्याची मागणी आमदारांनी केलेली आहे. या वाढीव अनुदान रकमेवर लवकरच निर्णय घेण्यात येईल. राज्यात 84 हजार 473 लाभार्थी असल्याचेही मंत्री फळदेसाई यांनी सभागृहात सांगितले. तात्पुरती बंद असलेली मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा ही योजना पुन्हा येत्या दोन महिन्यांत सुरू करण्यात येईल, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सभागृहात सांगितले.
22 सरकारी इमारतींमध्ये दिव्यांग बांधवांसाठी सोयी-सुविधा निर्माण केलेल्या आहेत. यावर सरकारने 4.13 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. 800 विद्यालयांची पाहणी करण्यात आलेली आहे. सीएसआर अंतर्गत ओएनजीसी यांच्याकडे निधीबाबत चर्चा सुरू आहे. कोविड काळात समाज कल्याण खात्याने कोविड सहाय्यता योजना सुरू केली होती. या योजनेचा लाभ 75 हजार 757 जणांनी घेतला आहे. या योजनेसाठी 25 हजार 995 अर्ज कागदपत्रांअभावी प्रलंबित असल्याचे ते म्हणाले. सोलर फेरीबोट भाड्याने चालविण्यास देण्यास नदी परिवहन खात्याची तयारी आहे. सोलर फेरीबोट केवळ तीन महिने चालली. ही फेरीबोट भाड्याने देण्याचा प्रस्ताव आहे. खात्याकडे 33 फेरीबोट आहेत. त्यापैकी 30 फेरीबोट चालतात. आणखी दोन रो-रो फेरीबोटी येणार आहेत. फेरीबोट चालविण्यासाठी वर्षाला 56 कोटी रुपये खर्च येतो. प्रवास तिकिटातून फक्त 70 लाखांचा महसूल येतो, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सभागृहाला दिली.
एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांची योजनेचा लाभ घेण्याकडे पाठ
अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना आहेत, त्याचा लाभ घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी बांधवांमध्ये खात्यामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत जागृती केली जाईल, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.