Sangli News | विटा ग्रामीण रुग्णालयात लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; नातेवाईकांचा निष्काळजीपणाचा आरोप
विटा: येथील ग्रामीण रुग्णालयातलसीकरण केल्यानंतर अवघ्या काही तासांत ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी दुपारी सोना तिरुपती राठोड (वय ४ महिने) या बालिकेला लसीकरणासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणले होते. तेथे तिला पेंटा-१, आयपीव्ही, रोटा-१ आणि पोलिओ असे लसीचे डोस देण्यात आले. कुटुंबियांच्या आरोपानुसार,लस दिल्यानंतर बालिकेला ताप आला होता. रात्रभर ती अस्वस्थ होती आणि मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, यावेळी उपस्थित नातेवाईकांनी रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.
कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी एकूण २५ बालकांना लस दिली होती. या बालकांच्या प्रकृतीची चौकशी करणे प्रशासनाचे कर्तव्य होते, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली.
याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रागिणी पवार यांनी माहिती देताना सांगितले की, लस दिल्यानंतर आम्ही साधारणपणे अर्धा तास बालकांना थांबवून घेतो. या दरम्यान कोणताही त्रास झालेला नसल्यास घरी जाण्यास सांगतो. लसीकरणानंतर बालकांना ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या असतात. संबंधित बालिकेला काल लस दिली होती, त्यावेळी तिची प्रकृती सामान्य होती. इतर बालकांनाही रिअॅक्शन आली नव्हती. दोन बालकांना ताप आल्याने त्यांना पालकांनी रुग्णालयात आणले होते, त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज दिला आहे.