सायबर घोटाळा प्रकरणी 4 अटकेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या गाजत असणाऱ्या कोट्यावधींच्या सायबर घोटाळाप्रकरणी प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) तामिळनाडूत चार जणांना अटक केली आहे. आपण सीबीआय आणि दिल्ली पोलिसांचे अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी देशातील अनेकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ईडीने देशभरातून यापूर्वीच आठ जणांना अटक केली आहे. चार नव्या आरोपींना अटक केल्याने आता ही संख्या 12 पर्यंत पोहचली आहे. या घोटाळ्यात किमान 20 जणांचा सहभाग असावा असा संशय ईडी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आरोपींचे टोळके धनवान लोकांवर लक्ष ठेवून त्यांना दूरध्वनीच्या व्हॉटस अप माध्यमातून सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून धमकी देत असत. विशिष्ट रक्कम विशिष्ट खात्यावर जमा केली नाही, तर आपल्यावर मोठी कारवाई केली जाईल, अशी धमकी देण्यात येत होती. अशा प्रकारे या टोळक्याने अनेक जणांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने ईडीने कारवाईला प्रारंभ केला आहे. या प्रकरणात प्रथम गुन्हा बेंगळूरमध्ये नोंद करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्याचे जाळे देशभर पसरल्याचे दिसून आले. गुन्हेगारांनी अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्या असून अनेक बँक खातीही उघडली होती. या खात्यांमधून आणि कंपन्यांमधून फसवणुकीच्या मार्गाने मिळविलेला पैसा फिरवला गेला, असे दिसून आले आहे.