तामिळनाडूत विषारी दारूचे 34 बळी
100 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू : जिल्हाधिकाऱ्यांची बदली, पोलीस अधीक्षक निलंबित : सीआयडीकडे सोपविला तपास
वृत्तसंस्था /कल्लाकुरिची
तामिळनाडूच्या कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारूचे प्राशन केल्यामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. संबंधित लोकांनी पाकिटातून मिळणाऱ्या दारूचे प्राशन केले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. कल्लाकुरिची जिल्ह्यातील करुणापुरम येथे 18 जून रोजी झालेल्या या घटनेच्या पीडितांमध्ये प्रामुख्याने मजुरांचा समावेश आहे. मद्यप्राशनानंतर रात्री त्यांची प्रकृती बिघडू लागली होती. पोलिसांनी याप्रकरणी के. कन्नुकुट्टी समवेत 4 जणांना अटक केली आडहे. कन्नुकुट्टीकडून सुमारे 200 लिटर विषारी दारू हस्तगत करण्यात आली आहे. या दारूमध्ये मेथनॉल मिसळण्यात आले होते. उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूमागील नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर विषारी दारूने अनेकांचा बळी घेतल्यावर द्रमुक सरकारने कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली आहे. त्यांच्या जागी एम.एस. प्रशांत यांची जिल्हाधिकारी तर रजत चतुर्वेदी यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
न्यायालयात आज सुनावणी
अण्णाद्रमुकने याचिका दाखल करत मद्रास उच्च न्यायालयाला कल्लाकुरिची प्रकरणी तत्काळ सुनावणी करण्याचे आवाहन केले आहे. न्यायाधीश डी. कृष्णकुमार आणि के. कुमारेश बाबू यांचे खंडपीठ या प्रकरणी आज सुनावणी करणार आहे. तर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. गोकुलदास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याचा निर्देश दिला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
डॉक्टरांचे विशेष पथक
20 हून अधिक जणांना कल्लाकुरिची वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले हेत. तर 18 जणांना पु•gचेरी जेआयपीएमईआर आणि 6 जणांना सालेम येथे हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारासाठी विल्लुपुरम, तिरुवन्नामलाई आणि सलेम येथून औषधे मागविण्यात आली आहेत. डॉक्टरांच्या विशेष पथकाला कल्लाकुरिची रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे.
सीबी-सीआयडीकडे तपास
राज्य सरकारने विषारी दारू प्रकरणाचा तपास सीबी-सीआयडीला सोपविला आहे. तसेच कल्लाकुरिची जिल्हाधिकारी श्रवण कुमार जाटवथ यांची बदली केली आहे. तर पोलीस अधीक्षक समय सिंह मीणा यांना निलंबित करण्यात आले. याचबरोबर 9 पोलिसांचेही निलंबन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मंत्री ई.व्ही. वेलु आणि सुब्रमण्यम यांना प्रभावित परिवारांना सहाय्य करण्यासाठी कल्लाकुरिची येथे पाठविले आहे.
विरोधकांकडून द्रमुक सरकार लक्ष्य
द्रमुक सत्तेवर आल्यापासून विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक मृत्यू होत आहेत. राज्य सरकारने याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी असल्याचे विरोधी पक्षनेते पलानिसामी यांनी म्हटले आहे. मागील वर्षी 22 जणांचा मृत्यू झाल्यावरही द्रमुकने धडा घेतला नाही. द्रमुकच्या कुशासनामुळे हे बळी गेल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली आहे.