डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर, फीडर सिरीजमध्ये 334 खेळाडूंचा सहभाग
वृत्तसंस्था/बडोदा
10 देशांतील सुमारे 334 खेळाडू येथे शुक्रवारपासून सामा इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर आणि डब्ल्यूटीटी फीडर सिरीजमध्ये विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडरची दुसरी आवृत्ती, ज्यामध्ये 11 वर्षांखालील ते 19 वर्षांखालील गटांचा समावेश आहे, 2 ते 5 जानेवारी दरम्यान आयोजित केली जाईल. त्यानंतर 7 ते 11 जानेवारीदरम्यान डब्ल्यूटीटी फीडर मालिका होईल. यूथ कंटेंडरमध्ये चार देशांचे 226 खेळाडू सहभागी होतील, तर फीडर मालिकेत 10 देशांचे 108 खेळाडू सहभागी होतील. कंटेंडरची सुऊवात शुक्रवारी 13 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील एकेरी स्पर्धांनी होईल, तर 11, 15 आणि 19 वर्षांखालील गटांतील स्पर्धा 4 आणि 5 जानेवारी रोजी होणार आहेत.
गेल्या वर्षी डब्ल्यूआयटी यूथ कंटेंडरमध्ये भारताने वर्चस्व गाजवले होते, ज्यात अंकुर भट्टाचार्जी आणि सिंड्रेला दास यांनी अनुक्रमे 19 वर्षांखालील मुलांच्या आणि मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले होते. एकेरीत विजेत्या ठरलेल्या दिव्यांशी भौमिकने 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे दोन्ही किताब जिंकले होते. दिव्यांशी या वर्षी 17 आणि 19 वर्षांखालील गटांमध्ये स्पर्धा करेल, तर सिंड्रेला आपले 19 वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद टिकवण्याचा प्रयत्न करेल.
सिंड्रेला आणि दिव्यांशी कोरिया प्रजासत्ताकच्या पार्क गाहयॉन (जागतिक क्रमवारीत 75 व्या क्रमांकावर) आणि यू येरिन (जागतिक क्रमवारीत 78 व्या क्रमांकावर) यांच्यासोबत डब्ल्यूटीटी फीडर मालिकेतही खेळताना दिसतील. महिला एकेरीतील भारतीय आव्हानाचे नेतृत्व अनुभवी सुतीर्था मुखर्जी आणि आयहिका मुखर्जी यांच्यासोबतच वाईल्ड कार्ड मिळालेली आणि जागतिक क्रमवारीत 85 व्या क्रमांकावर असलेली यशस्विनी घोरपडे करेल. पुऊष एकेरीमध्ये मनुष शाह हा हरमीत देसाई, स्नेहित एस. आणि अंकुर भट्टाचार्जी यांच्यासोबत देशाचे प्रतिनिधीत्व करेल. मनुष व दिया चितळे ही हंगामाच्या अखेरीस होणाऱ्या डब्ल्यूटीटी फायनल्ससाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय मिश्र दुहेरी जोडी ठरली आहे.
जेव्हा तुम्हाला ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पात्र व्हायचे असते, तेव्हा तुम्हाला चांगल्या रँकिंगची आवश्यकता असते. रँकिंग गुण मिळवण्यासाठी खेळाडूंना अनेकदा परदेश प्रवासावर मोठा खर्च करावा लागतो, याकडे भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता यांनी लक्ष वेधले आहे. भारतात अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे अधिक खेळाडूंना खूप कमी खर्चात स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते आणि त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदाही मिळतो, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.