30 हजार महिलांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण
राज्य सरकारकडून मार्गसूची जाहीर : निवडक शंभर ग्राम पंचायतींमध्ये आयोजन : व्यवसायावर आधारित केंद्रे सुरू करणार
बेळगाव : ग्राम पंचायत स्तरावर स्व-साहाय्य गटामार्फत ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सरकारने काही योजना, उपक्रम सुरू करून त्याची अंमलबजावणीची तयारी केली आहे. निवडक शंभर ग्राम पंचायतींमध्ये महिलांच्या आकांक्षा व आवडीनुसार व्यवसायावर आधारित कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सरकार पुढे आले आहे. 30 हजार महिलांना या प्रशिक्षण शिबिराचा लाभ मिळणार आहे. निवडक 100 ग्राम पंचायतींमध्ये प्रत्येकी 300 महिलांप्रमाणे गट तयार करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासंबंधी सरकारने मार्गसूची जाहीर केली आहे.
एकूण 100 केंद्रे सुरू करणार
ग्रामीण विकास व पंचायत राज खाते तसेच राष्ट्रीय जीवनोपाय अभियान यांच्या सहयोगाने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण महिला उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, त्यांच्यात कौशल्याचा अभाव असतो. स्वयंरोजगार सुरू करावा तर भांडवल असत नाही. त्यामुळे ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये महिलांच्या आशा-आकांक्षा लक्षात घेऊन व्यवसायावर आधारित कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यातून निवडक तीन ग्राम पंचायतींप्रमाणे एकूण 29 जिल्ह्यांमधून 87 केंद्रे तसेच बेळगाव जिल्ह्यातून 7 व तुमकूर जिल्ह्यातून 6 केंद्रे याप्रमाणे एकूण 100 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. कशिदा, शिवणकाम, बॅगा तयार करणे, मातीच्या गृहोपयोगी वस्तू तयार करणे, भाकरी बनवणे, मसाल्याचे पदार्थ बनवणे तसेच इतर उत्पन्न मिळवून देणारे उपक्रम केंद्रातून सुरू करता येणार आहेत.
महिलांच्या निवडीसाठी निकष
- स्व-साहाय्य गट/ग्राम पंचायत महासंघातील सदस्य, किमान 18 ते कमाल 50 वर्षांपर्यंतच्या महिलांची निवड करणे
- महिला सदस्यांना लिहिता-वाचता यावे. अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, दिव्यांग, विधवा, तृतीयपंथी, माजी देवदासींच्या मुलींना प्राधान्य देण्यात यावे.
- स्व-साहाय्य गटामार्फत महिलांच्या आवडीनुसार उपक्रम हाती घेतल्याची यादी तयार करून ग्राम पंचायतीमार्फत यादीला संमती मिळवावी. तसेच संबंधित तालुक्यातील ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यातर्फे यादी प्रमाणित करून प्रशिक्षण केंद्राकडे यादी सुपूर्द करणे.
- आतापर्यंत स्व-साहाय्य गट व बँकेमार्फत कर्ज घेऊन घरगुती उद्योग, व्यवसाय सुरू केलेल्या महिलांनाही संधी देणे.
योजनेची उद्दिष्ट
- संजीविनी अंतर्गत रचना करण्यात आलेल्या स्व-साहाय्य गटातील महिलांच्या आकांक्षेनुसार व आवडीनुसार व्यवसायावर आधारित प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे.
- ग्रामीण भागात सुसज्जीत प्रशिक्षण केंद्रे उभारणे.
- ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासंबंधी मार्गदर्शन करून, स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे. ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक साधनांचा योग्यरीतीने वापर करून उत्पादने तयार करणे व त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रोत्साहन देणे.
- समग्र ग्रामीण विकासासाठी प्रेरणा देण्याबरोबरच ग्रामीण भागातील महिलांचे रोजगारासाठी स्थलांतर रोखणे.