कळसवलीत 3 लाख 82 हजार 817 वृक्ष
राजापूर :
राजापूर तालुक्यातील कळसवली ग्रामपंचायतीने गावात वृक्ष गणना केली आहे. गावात एकूण 3 लाख 82 हजार 817 वृक्ष असून, त्यातील 213 वृक्ष पुरातन असल्याची माहिती कागदावर आली आहे. कळसवली ग्रामपंचायतीने राबविलेल्या या मोहीमेचे तालुक्यातून कौतुक करण्यात येत असून अन्य ग्रामपंचायती समोर एक आदर्श ठेवला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुरातन वृक्षांचे जतन, संरक्षण होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुळात गावात वृक्षसंपदा किती आहे, कोणत्या प्रकारची आहे, याची मोजदाद गरजेची आहे. हीच बाब लक्षात घेत गावात पडणाऱ्या पावसाचा आणि पाणी वापराचा विचार करून जलअंदाजपत्रक तयार करण्याचा अनोखा प्रयोग करणाऱ्या येथील ग्रामपंचायत अधिकारी सोनाली आराख यांनी माझी वसुंधरा अभियानात वृक्ष गणना उपक्रम राबवला आहे. सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे सहकार्य, ग्रामपंचायतीच्या जैव विविधता समितीने घेतलेला पुढाकारातून ही गणना झाली आहे.
गावात 50 वर्षांपेक्षा अधिक जुनी असलेली झाडे, इतर वृक्ष, जंगली झाडे आणि लागवड केलेली झाडे, अशा सर्व प्रकारच्या वृक्षांची गणना करण्यात आली. त्यानुसार गावात वड, चिंच फणस, आवळा, पिंपळ यांसारख्या 18 प्रकारचे 213 पुरातन वृक्ष आहेत. याखेरीज आईन, काटेशिवर, किंजळ यासारख्या 21 प्रकारचे 3 लाख 22 हजार 815 वृक्ष आहेत. तसेच वृक्षांचे कूळही कागदावर ही गणना करताना वृक्षाचे शास्त्राrय नाव काय आहे, त्याचे कूळ काय आहे आणि त्याची उत्पत्ती कुठली आहे, याची माहितीही कागदावर आणण्यात आली आहे. भारतीय झाडांबरोबरच परदेशात उत्पत्ती झालेली अनेक झाडे यामध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर त्यांचा घेर (परिघ) किती आहे, त्यांची उंची किती आहे, वय किती असावे या साऱ्याची नोंदही करण्यात आली आहे.
गावात वृक्ष संपदा किती आहे, कोणती आहे, याची गणना पाच वर्षांनी करणे आवश्यक आहे. पर्यावरणीय समतोलासाठी त्यांचे जतन होणे गरजेचे आहे. दर पाच वर्षांनी वृक्ष गणना केली तर गावात वृक्षतोड होत आहे का, नवी लागवड होत आहे की नाही, हे समजण्यासाठी आणि त्यातून नव्या लागवडीसाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी ही गनणा महत्वाची असल्याने त्यांनी हा अनोखा उपक्रम राबवून तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे.