कलखांब येथे सांडपाणी प्रकल्प राबविण्यासाठी साडेतीन कोटी मंजूर
पीडिओ गोपाळ बुडची यांनी ग्रामसभेत दिली माहिती : प्रकल्पासाठी मुचंडी-बस्तवाड गावांचीही निवड
वार्ताहर/सांबरा
कलखांब (ता. बेळगाव)येथे सांडपाणी प्रकल्प राबविण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पीडीओ गोपाळ बुडची यांनी ग्रामसभेमध्ये दिली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा लक्ष्मी लोहार होत्या. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या फोटोचे पूजन करून ग्रामसभेला सुऊवात करण्यात आली. यावेळी पीडीओ गोपाळ बुडची म्हणाले की, सांडपाणी प्रकल्प राबविण्यासाठी कलखांबसह तालुक्यातील मुचंडी व बस्तवाड गावांची निवड झाली आहे. गावामध्ये हा प्रकल्प राबविण्यासाठी अकरा जणांची निवड कमिटी करण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत संपूर्ण गावातील गटारीवर झाकणेही बसविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प राबविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही रोजगार महिला प्रमुख शर्मिला पाटील यांनी दिली. गावातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच शासनाच्या अनुदानातून जनावरांचा गोठा बांधण्यासाठी 57 हजार, शेळ्या मेंढ्यांचा गोठा बांधण्यासाठी 70हजार, पोल्ट्री शेडसाठी 70 हजार ऊपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
करात 20 टक्के सूट
गावातील कर मोठ्याप्रमाणावर थकला आहे. यासाठी ऑक्टोबरमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी व दिवापट्टी भरल्यास त्यामध्ये 20 टक्के सूट देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. लवकरच गोकाक रोडच्या उत्तरेकडील रस्ता ऊंदीकरणाचे काम सुरू होणार असून गटार स्ट्रीटलाईटचे कामदेखील हाती घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
स्मशानभूमी-कचरा डेपोसाठी प्रत्येकी एक एकर जागा द्या
सध्या गावचा विस्तार झपाट्याने वाढत असून स्मशानभूमीचा प्रश्न उद्भवत आहे. गावातील कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही. गावच्या हद्दीमध्ये अरण्य खात्याची 550 एकर जागा आहे व गावाला गायरानही नाही. त्यासाठी गावच्या स्मशानभूमीसाठी एक एकर व कचरा डेपोसाठी एक एकर जागा उपलब्ध करून द्यावी, असा ठराव मनोहर हुक्केरीकर यांनी मांडला. या ठरावाला सर्वांनी मान्यता दिली. तसेच मराठी व कन्नड शाळेतील कचऱ्याचे विघटन करून गांडूळ खत तयार करून विक्री करावी, असेही ठरविण्यात आले. यावेळी मराठी शाळेतील झाडे तोडण्यासाठी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला. शेतकऱ्यांची वारसा, फोडी इतर कामे करून देण्यासाठी तहसीलदारांनी गावात एक कार्यक्रम घ्यावा, असेही ठरविण्यात आले. ग्रामसभेला ग्रा. पं. सदस्य पिंटू पाटील, कमलाप्पा अष्टगी, यल्लाप्पा असोदेकर, प्राथमिक कृषी पत्तीनचे अध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष दिनेश परमोजी, दुधाप्पा असोदेकर, यल्लाप्पा मासेकर, बाबू हिरोजी, ग्रा. पं. उपाध्यक्षा सुजाता कांबळे, रेश्मा चौगुले, ज्योती बेळगावकर, कस्तुरी करीकट्टी, रोजगार हमी योजनेच्या अधिकारी ज्योती कम्मार, ग्रा. प.ं सेक्रेटरी रसूल वारीमनी, नागेश कांबळे, सिद्राय अष्टगीसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.