26/11 हल्ला कमकुवत सरकारमुळेच
तेलंगणाच्या सभेत मोदींकडून काँग्रेस लक्ष्य
तेलंगणातील प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीआरएस सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. केसीआर यांचे सरकार तेलंगणाला लुटण्यात व्यस्त आहे. केसीआर हे सचिवालयात देखील जात नाहीत, स्वत:च्या फार्म हाउसमधूनच सरकार चालवितात, तेलंगणात मदिगा समुदायावर मोठा अन्याय होत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
जनतेने 2014 मध्ये काँग्रेसचे कमकुवत सरकार हटवून भाजपचे मजबूत सरकार आणले आणि आम्ही आज देशातून दहशतवादाचे उच्चाटन केले आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आमच्या देशाच्या अनेक निर्दोष लोकांनी जीव गमावला होता. कमकुवत आणि अक्षम सरकार देशाला किती नुकसान पोहोचवू शकते याची आठवण हा दिवस आम्हाला करून देत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
काँग्रेस आणि बीआरएस या दोन्ही पक्षांची ओळख भ्रष्टाचार, घराणेशाही, तुष्टीकरण आणि खराब कायदा-सुव्यवस्थेमुळे होते असे म्हणत मोदींनी ‘काँग्रेस-केसीआर एक समान, दोनों से रहो सावधान, भाजप बढाऐगी तेलंगणा का मान’ असा नारा दिला आहे.
केसीआर हे विश्वासघात करण्याची एकही संधी गमावत नाहीत. त्यांनी दलित मुख्यमंत्री करण्याचे स्वत:चे आश्वासन पूर्ण न करून विश्वासघातच केला आहे. केसीआर यांनी दलित बंधू योजनेच्या स्वत:च्या आश्वासनावरून धोकाच दिला आहे. दोन बेडरुम्सचे घर उपलब्ध करविण्याच्या स्वत:च्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला. केसीआर यांनी शेतकऱ्यांची देखील फसवणूक केली असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
इंडिया आघाडी होणार पराभूत
तीन राज्यांमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जाण्याची मला संधी मिळाली. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तिन्ही ठिकाणी मतदान झाले आहे. या तिन्ही राज्यांमध्ये इंडिया आघाडीचा पराभव होणार असल्याचे चित्र दिसून आले आहे. काँग्रेसच्या शासनकाळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या नावावर घोटाळे झाले आहेत. काँग्रेसशासित राज्यांमध्ये पेपर लीकच्या सर्वाधिक घटना घडल्या. बीआरएस देखील या प्रकरणी काँग्रेसपेक्षा मागे नसल्याची टीका मोदींनी केली आहे.