एलआयसीच्या नफ्यात 23 टक्क्यांची वाढ
मार्चच्या तिमाहीत 23467 कोटींचा नफा
वृत्तसंस्था, मुंबई
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एलआयसीने मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षाच्या समान तिमाहीतील नफ्यापेक्षा यंदा नफा वाढ 23 टक्के अधिक नोंदली गेली आहे. उत्तम विमा व्यवसायामुळे हे साध्य झाल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आर्थिक वर्षातला नफा हा 57,419 कोटी रुपयांवर पोहचला असून तो वर्षाच्या आधारावर पाहता 19 टक्के अधिक आहे. कंपनीने 10 रुपये प्रति समभाग लाभांश देण्याची घोषणा केली आहे. याआधी कंपनीकडून 1:1 बोनस शेअर देण्याची घोषणा करण्यात आली होती.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे सीईओ आर दोरायस्वामी यांनी सांगितले की मार्च अखेरच्या तिमाहीत कंपनीने 2,53,592 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीत 2,22,805 कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने घेतले होते. 31 मार्च 2026 च्या आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 57,419 कोटी रुपयांचा राहिला असून याच्या मागच्या आर्थिक वर्षात तो 48,151 कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्षाचे उत्पन्न 9,73,288 कोटी रुपये इतके नोंदले गेले, जे मागच्या आर्थिक वर्षात 8,84,148 कोटी रुपये इतके होते. नव्या प्रिमीयम व्यवसायात झालेल्या वाढीमुळे नफ्यात, उत्पन्नात कंपनीने वाढ प्राप्त केलेली असल्याचे दोरायस्वामी यांनी म्हटले आहे.
आकडेवारी...
31 मार्च 2026 आर्थिक वर्षात
9,73,288 कोटी रुपये उत्पन्न
आर्थिक वर्षात 57,419 कोटी रुपये इतका नफा
31 मार्च 2025 आर्थिक वर्षात
8,84,148 कोटी रुपये उत्पन्न
आर्थिक वर्षात
48,151 कोटी रुपये इतका होता नफा