आगरतळा रेल्वेस्थानकावर 23 बांगलादेशींना अटक
वृत्तसंस्था/ आगरतळा
भारतात अवैध प्रवेश केल्याच्या आरोपाखाली सुरक्षा दलांनी एका एजंटसह किमान 23 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. रेल्वे पोलीस दलाच्या जवानांनी आगरतळा रेल्वेस्थानकावर या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. हे बांगलादेशी नागरिक गुवाहाटीमार्गे अन्य भारतीय राज्यांच्या प्रवासासाठी रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत होते.
19-40 या वयोगटातील बांगलादेशी नागरिक हे रोजगाराच्या शोधात भारतात आले होते. बांगलादेशच्या राजशाही विभागातील चपैनवाबगंज जिल्ह्यातील हे रहिवासी आहेत. राजशाही विभाग हा बांगलादेशच्या उत्तर-पश्चिम भागात आहे. मागील काही दिवसांमध्ये बांगलादेशच्या अनेक नागरिकांना त्रिपुरामध्ये प्रवेश केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
बांगलादेशचे चितगाव आणि सिलहट विभागांसोबत त्रिपुराची 856 किलोमीटरची सीमा लागून आहे. निमलष्करी दल बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीविरोधात कठोर कारवाई करत आहेत आणि सीमावर्ती क्षेत्रात देखरेख वाढविण्यात आली असल्याचे बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या निर्देशानंतर बीएसएफने बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातील स्वत:च्या मोहिमेला गती दिली आहे. तसेच सीमावर्ती भागातील घुसखोरी घडवून आणणऱ्या एजंटांची धरपकड केली जात आहे. त्रिपुराला लागून असलेल्या सीमेवर कुंपण उभारण्यात येत असल्याचे त्रिपुरा फ्रंटियरच्या महानिरीक्षकांनी सांगितले.