2025 ची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतात
वृत्तसंस्था/मुंबई
2025 साली होणाऱ्या पुरूषांच्या टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारत भूषविणार आहे. सदर घोषणा आशियाई क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने नुकतीच येथे केली. 2024 ते 2027 या कालावधीत खेळविल्या जाणाऱ्या आशियाई क्रिकेट मंडळाच्या (एसीसी) इच्छुक पुरस्कर्त्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.
2024 ची पुरूषांची आशिया चषक 50 षटकांची क्रिकेट स्पर्धा पाक आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविण्यात आली होती. आता 2027 ची पुरूषांची 50 षटकांची आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद बांगलादेशला देण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारत, पाक, श्रीलंका, बांगलादेश, अफगाण आणि पात्र स्पर्धेतील एका संघाचा समावेश राहिल. या स्पर्धेमध्ये एकूण 13 सामने खेळविले जातील. महिलांची आगामी आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत एकूण 15 सामने खेळविले जाणार आहेत. ही स्पर्धा 2026 साली होईल. 2024 ची महिलांची आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा नुकतीच डंबुला येथे झाली आणि त्यामध्ये यजमान लंकेने भारताचा पराभव करत पहिल्यांदा अजिंक्यपद मिळविले.
माजी क्रिकेटपटूंसाठी सुविधा
देशातील माजी 26 प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंना भारतीय क्रिकेट संघटनेतर्फे आर्थिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दरम्यान हे माजी क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघटनेचे सदस्य आवश्यक आहेत. अशा माजी क्रिकेटपटूंना बीसीसीआयकडून सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. 10 ते 24 प्रथमश्रेणी सामने खेळणारे तसेच 70 पेक्षा अधिक वय असलेल्या माजी क्रिकेटपटूंना आजपर्यंत बीसीसीआयकडून किंवा संबंधित राज्यांच्या क्रिकेट संघटनांकडून कोणतेही आर्थिक सहाय्य देण्यात आले नव्हते. पण गेल्या मार्चमध्ये झालेल्या भारतीय क्रिकेट संघटनेच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माजी क्रिकेटपटूंना 2.5 लाख रुपयांचा आरोग्य विमा उपलब्ध करुन दिला जाईल.