हद्दवाढीच्या विरोधासाठी आज २० गावे बंद
सर्व व्यवहार होणार ठप्प : १८ गावे, २ औद्योगिक वसाहतींचा समावेश: मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात हद्दवाढीसाठी आज महत्वापूर्ण बैठक
कोल्हापूर
शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी प्रस्तावित २० गावांनी (१८ गावे आणि दोन औद्योगिक संस्था) आक्रमक भूमिक घेतली आहे. राज्य शासनाने हद्दवाढीचा जबरदस्तीने अथवा एकतर्फी निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईमध्ये आज, सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर हद्दवाढीतील प्रस्तावित २० गावांनी आज, गाव बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे.
हद्दवाढीच्या समर्थनार्थ कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ असा पवित्र त्यांनी घेतला आहे. ५२ वर्ष झाले तरी शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. शहर लगतच्या गावांचा ताण शहरावर पडत आहे. महापालिकेच्या सुविधा शहरलगतची गावे घेत असून त्यांना हद्दवाढीत घेतले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. यासंदर्भात शहर हद्दवाढ समितीने पुन्हा आंदोलन तीव्र केले आहे. त्यांनी रविवारी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज सोमवारी यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली असून हद्दवाढीबाबत ठाम भूमिका मांडणार असून या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही दिली.
एकीकडे हद्दवाढ समर्थक हद्दवाढीसाठी अॅक्टीव्ह झाले असून त्यांनी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले तर दुसरीकडे हद्दवाढीच्या विरोधासाठी कोल्हापूर महापालिका शहर हद्दवाढ विरोधी समितीनेही अक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनीही रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हद्दवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन केले. यावेळी आमदार चंद्रदिप नरके यांनी आंदोलन स्थळी येवून पाठींबा दिला. मुंबईत होणाऱ्या बैठकीत हद्दवाढीला प्रखर विरोध दर्शवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच प्रथम शहराचा विकास करावा नंतर हद्दवाढीचा विचार करावा, २०१७ मध्ये अशाच प्रकारे आंदोलन झाल्याने तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची नियुक्ती केली असून पहिल्या टप्प्यात प्राधिकरणामार्फत गावांचा विकास केला जाईल असे त्यांचे धोरण होते. त्यानुसार प्राधिकरणातून गावांना निधी देवून विकासित करावी. २० गावांतील सरपंचाचे म्हणणे ऐकून घ्यावे. परस्परच जबरदस्तीने, एकतर्फी आणि घाईगडबडीत याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही आमदार नरके यांनी दिला.
तसेच हद्दवाढीला विरोध म्हणून आज, सोमवारी २० गावांना बंद पुकारला आहे. धरणे आंदोलनास्थळी सोमवारचा बंद १०० टक्के यशस्वी करण्याचे निर्धारही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक आणि दुसरीकडे २० गावात बंद अशी स्थिती असणार आहे.
टिपरवरून गाव बंदचे आवाहन
हद्दवाढीच्या विरोधात 20 गावांतील नागरिक एकजुट झाले आहेत. शहरात विकास होत नसताना हद्दवाढ करून काय करणार असी त्यांची भूमिका आहे. हद्दवाढीला विरोध म्हणून सोमवारी २० गावांनी बंदचे आवाहन केले आहे. रविवारी सायंकाळी ग्रामपंचायतीच्या कचरा उठाव करणाऱ्या टिपरमधून सोमवारी गाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
मुंबईतील बैठकीकडे नजरा
उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील विधानभवनातील दालनात दुपारी १ वाजता कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भात आज, बैठक बोलवली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदिप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीकडे कोल्हापूर शहरासह प्रस्तावित गावांमधील सर्वांच्या नजरा लागून आहेत.
आज बंद असणारी गावे
१) शिरोली २) नागाव ३) वळिवडे-गांधीनगर ४) मुडशिंगी ५) सरनोबतवाडी ६) गोकुळ शिरगांव ७) पाचगांव ८) मोरेवाडी ९) उजळाईवाडी १०) नवे बालिंगे ११) कळंबे तर्फ ठाणे १२) उचगांव १३) वाडीपीर १४) आंबेवाडी १५) वडणगे १६) शिये १७) शिंगणापूर १८) नागदेववाडी २ औद्योगिक वसाहती १) शिरोली, एमआयडीसी २) गोकुळ शिरगांव, एमआयडीसी
हद्दवाढीवरून कोल्हापुरचे पुन्हा वातावरण तापले
हद्दवाढीवरून शहर आणि ग्रामिण भाग आमने-सामने आले आहेत. २०१७ मध्येही अशीच स्थिती होती. यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्य मार्ग म्हणून ४२ गावांसाठी प्राधिकरणाची नियुक्ती केली.