जीनोम-एडिटेड भाताचे 2 नवे वाण सादर
खर्च घटणार अन् पाणी वाचणार : कृषिमंत्र्यांनी केले लाँच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी दिल्लीमध्ये दोन नवे जीनोम-एडिटेड भाताचे वाण सादर केले आहेत. या वाणांचे नाव डीआरआर राइस 100 (कमला) आणि पूसा डीएसटी राइस 1 आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएमआर) हे वाण विकसित केले आहेत. हे दोन्ही नवे प्रकार कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकतात, यामुळे उत्पादन वाढेल, कमी पाण्यात पीक येईल आणि खर्चही घटणार आहे. तसेच हे वाण बदल्यात हवामानातही भरघोस पीक देतील असे उद्गार चौहान यांनी काढले आहेत.
सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी 6 मुद्द्यांवर काम करत आहे. यात उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च घटविणे, पिकाला योग्य दर मिळवून देणे, नुकसानाची भरपाई करणे, शेतीत वैविध्य आणणे आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने वाटचाल सामील आहे. भाताचे जे दोन नवे वाण सादर झाले आहेत, ते उत्पादन खर्च घटविणे आणि उत्पादन वाढविण्यास मदत करणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना लाभ होण्यासह सर्वसामान्य लोकांना स्वस्त अन् पोषक धान्य मिळणार असल्याचे चौहान यांनी नमूद केले आहे.
पाण्याची बचत अन् पीक लवकर येणार
या नव्या प्रकारांमुळे पीक लवकर तयार होणार असल्याने पुढील पिकासाठी पेरणी वेळेत होऊ शकेल. तसेच भातशेतीत सिंचनाचे पाणीही कमी लागेल. यामुळे सुमारे 7500 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होईल आणि ही देशासाठी मोठी कामगिरी ठरेल असे उद्गार कृषिमंत्र्यांनी काढले आहेत.
जगाचे अन्नभांडार
आगामी काळात आम्हाला भारताला जगाचे फूड बास्केट म्हणजे अन्नभांडार करायचे आहे. भारत दरवर्षी 48 हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ विदेशात विकतो, हे आमच्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. आता सोयाबीन, तूरडाळ, मसूर आणि अन्य डाळींचे उत्पादनही वेगाने वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जीनोम एडिटिंग तंत्रज्ञान
या भाताच्या वाणांना सीआरआयएसपीआर-सीएएस नावाच्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आले आहे. यात रोपांच्या जीनमध्ये अत्यंत सुक्ष्म बदल केले जातात, परंतु कुठलाही बाहेरील (विदेशी) जीन टाकला जात नाही. हे तंत्रज्ञान सुरक्षित मानले जाते आणि भारतात या शेतीसाठी मंजुरी मिळाली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे विकसित या वाणांचे दोन मुख्य लाभ आहेत. यातील पहिला लाभ पीक लवकर तयार होते तर दुसरा लाभ कमी पाण्यातही चांगले पीक मिळते हा आहे.