आलमट्टीतून 2.75 टीएमसी पाणी सोडणार
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती : कृष्णा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या समस्या होणार दूर
प्रतिनिधी/बेंगळूर
कृष्णा खोऱ्यातील (विजापूर, बागलकोट आणि कलबुर्गी) शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आलमट्टी धरणातून 2.75 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. बेंगळुरातील आपल्या गृहकार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते.
कृष्णा अप्पर योजनेतील विजापूर, बागलकोट, रायचूर, यादगिरी यासह विविध जिल्ह्यातील शेतकरी, आमदार, विधानपरिषद सदस्य, मंत्री, जिल्हाधिकारी, पाटबंधारे अधिकाऱ्यांची शनिवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या भागातील मिरची पिकाला पाणी देण्याची मागणी करत शेतकरी कार्यालयासमोर ख•s खोदून त्यामध्ये बसून आंदोलन करत आहेत. सरकारला अशाप्रकारे ब्लॅकमेल करणे चांगले नाही, असे मी त्यांना सांगितले आहे, असेही शिवकुमारांनी स्पष्ट केले.
आलमट्टी आणि नारायणपूर या दोन्ही जलाशयांची एकूण पाणी साठवण क्षमता 154 टीएमसी आहे. परंतु सध्या 2 जलाशयातून केवळ 47.01 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व इतर गरजांसाठी 30 जूनपर्यंत 38.788 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. बाष्पीभवनसाठी 3.90 टीएमसी पाण्याची बचत करायची आहे. आलमटीतून नारायणपूर जलाशयात पाणी वाहून जाताना 1.50 टीएमसी पुरवठा नष्ट होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता एकूण 44.188 टीएमसी पाणी राखीव ठेवणे गरजेचे आहे. फक्त 2.8 टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. यातील 2.75 टीएमसी पाणी तातडीने सोडले जाईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पोलीस खात्याने सोडलेले पाणी शेवटच्या भागातपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडावी. राज्यातील 223 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. कृष्णा नदीच्या भागातील 92 तालुके दुष्काळग्रस्त आहेत. सध्या तरी पावसाची शक्मयता कमी आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे आहे, असेही डी. के. शिवकुमार म्हणाले.
‘नदीजोड’साठी 17-18 रोजी केंद्रीय शिष्टमंडळ राज्यात
देशात नदीजोड योजनांच्या मुद्द्यावर अभ्यास करणारे खासदारांचे शिष्टमंडळ 17 आणि 18 तारखेला राज्याचा दौरा करणार आहे. दरम्यान, आपल्या नद्यांचे निरीक्षण करेल. नदीजोड हा देशभरात चर्चेचा मोठा विषय आहे. याबाबत सविस्तर चर्चा सध्या सुरू आहे. 31 खासदारांचे शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर येत असून पाणीपुरवठा प्रश्नांवर चर्चा करणार आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.