चाच्यांच्या हल्ल्यात 17 मच्छीमार जखमी
वृत्तसंस्था / चेन्नई
श्रीलंकेच्या समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्यात तामिळनाडूचे 17 भारतीय मच्छीमार जखमी झाले असल्याचे वृत्त आहे. हे मच्छीमार या राज्यातील नागपट्टीणम या जिल्ह्यातील असल्याची माहिती देण्यात आली. 30 मच्छीमारांचा एक गट समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेल्या असताना शनिवारी दुपारी समुद्री चाच्यांनी त्याच्यावर हल्ला केला. 13 मच्छीमार निसटून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र 17 जणांना जखमा झाल्या आहेत. सर्व मच्छीमार भारतात सुखरुप आले असून जखमींवर उपचार केले जात आहेत. श्रीलंकेने या देशातील समुद्री चाच्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भारताने अनेक वर्षांपासून केली आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकेच्या चाच्यांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशांचा समुद्र तट नजीक असल्याने संघर्षाचे प्रसंग वारंवार उद्भवत असतात, अशीही माहिती यासंदर्भात देण्यात आली आहे.