पश्चिम आशियातील संघर्षात आतापर्यंत 16 भारतीय ठार
केंद्र सरकारची संसदेत माहिती : 75 जण जखमी झाल्याचेही स्पष्ट
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष सुरू झाल्यापासून 16 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेला दिली आहे. मृतांमध्ये 10 भारतीय खलाशांचा समावेश असून या संघर्षात 75 भारतीय जखमी झाले असल्याचेही सभागृहात स्पष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेमध्ये युद्धजन्य काळातील जीवितहानीसंबंधी माहिती दिली. या मृतांमध्ये ओमानमधील संघर्षात 8, संयुक्त अरब अमिरातीमध्ये 4, कुवेतमध्ये 2, सौदी अरेबियामध्ये 1 आणि इराकमधील संघर्षात एका भारतीयाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जखमींमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये 32, ओमानमध्ये 24, कुवेतमध्ये 13, कतारमध्ये 4, सौदी अरेबियामध्ये 1 आणि इस्रायलमध्ये 1 अशा भारतीयांचा समावेश आहे.
इराणमध्ये अडकलेल्या 2,557 भारतीयांना अर्मेनिया आणि अझरबैजानमार्गे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचेही सरकारने सांगितले. सरकारच्या म्हणण्यानुसार, युद्धक्षेत्रात मृत झालेल्या भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांना डीजीएमए कल्याण योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत 16 पैकी 5 प्रकरणांमध्ये नुकसान भरपाई त्यांच्या वारसांना प्रदान करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.