Rain News | अजूनही १५१ वाड्या तहानलेल्याच
मान्सूनचे आगमन झाले तरी पाणी टंचाईचे संकट कायम
रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अनेक भागांतील पाणी टंचाईचे संकट अद्याप कायम आहे. मे महिन्यातील अवकाळी सरी आणि मान्सूनचे आगमन झाले असले तरीही ग्रामीण भागातील पाणीटंचाईची दाहकता कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील ६४ गावांच्या १५१ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून येथील ४५ हजार ८८३ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला अद्यापि टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यात सध्या विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे मान्सूनच्या पावसाने सुरुवात केली आहे तर दुसरीकडे कडक उन्हाचा दाहही कायम आहे.
या प्रचंड उष्णतेमुळे जिल्ह्यातील विहिरी, नदीपात्र, सार्वजनिक तलाव आणि पाझर तलाव झपाट्याने आटले आहेत. भूगर्भातील पाणीपातळी खालावल्याने पावसाचा जोर वाढेपर्यंत या भागातील पाणीटंचाईची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जिल्हा पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टंचाईग्रस्त वाड्यांचा आकडा १५१ वर पोहोचला आहे.
दुर्गम आणि डोंगराळ भागातील वाड्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून १५ खाजगी आणि ३ शासकीय अशा एकूण १८ टँकरची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत या टँकरद्वारे तब्बल २ हजार ६५३ फेऱ्या पूर्ण करून जिल्ह्यातील नागरिक आणि जनावरांची तहान भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जून महिना उजाडूनही अनेक गावे व वाड्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामीण भागातील जनतेत चिंतेचे वातावरण आहे.
लांजा-राजापूरला दिलासा