For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सीमेवरील गोळीबारात 15 जणांचा मृत्यू

06:36 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
सीमेवरील गोळीबारात 15 जणांचा मृत्यू
Advertisement

नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान संतापला

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला. दोन्ही ठिकाणी तणावाची स्थिती आहे. येथील गोळीबारात 15 नागरिक ठार झाले असून 33 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

22 एप्रिल रोजीच्या पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याचवेळी, भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या या नापाक कृत्याला योग्य उत्तर दिले आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिल्यामुळे कुपवाडा आणि राजौरी-पूंछ सेक्टरमधील अनेक पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील चौक्यांमधून मनमानीपणे गोळीबार केला. पाकिस्तानी गोळीबार केवळ पूंछपुरता मर्यादित नव्हता तर जम्मू क्षेत्रातील राजौरी जिह्यातील आणि कुपवाडा जिह्यातील उरी, कर्नह आणि तंगधार सेक्टरमधील पुढच्या भागांनाही लक्ष्य केले. स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांनी या अंदाधुंद गोळीबाराचे वर्णन क्रूर आणि भ्याड असे केले. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सीमावर्ती भागात गोळीबार सुरू झाल्यामुळे निवासी इमारतींचे नुकसान झाले. स्फोटांचा मोठा आवाज ऐकून जागे झालेल्या लोकांना आश्रयासाठी पळावे लागले.

सीमेनजिकचा परिसर रिकामा करण्याचे निर्देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या नागरिकांना हा परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. अमित शाह हे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजित सिंह चौधरी, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून सतत संपर्कात आहेत. नियंत्रण रेषेजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. येथील नागरिकांची सुरक्षा ही भारताची प्राथमिकता आहे यावर त्यांनी भर दिला.

Advertisement
Tags :

.