For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे अपघातात 15 ठार, 60 जखमी

06:58 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे अपघातात 15 ठार  60 जखमी
Advertisement

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक : मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता, दार्जिलिंग

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी मालगाडीने सियालदाहच्या दिशेने जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या धडकेनंतर प्रवासी रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 60 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अपघातस्थळी दाखल झाले असून त्यांनी अपघातामागील कारणे शोधण्याचा आणि मदत व बचावकार्याचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Advertisement

आगरतळाहून सियालदाहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला (13174) मालगाडीने मागून जोरदार धडक दिल्यामुळे कांचनजंगा एक्सप्रेसचे तीन डबे ऊळावरून घसरले. सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास उत्तर बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्थानकापासून सुमारे 30 किमी अंतरावर हा अपघात घडला. या अपघातानंतर सदर मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प झाली होती. कटिहार विभागातील रंगपानी स्टेशन आणि चटर हॉल्ट दरम्यान हा अपघात झाल्यानंतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सरस्वती चंद्रा यांनी सांगितले. या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या होत्या.

अपघातानंतर अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांसह अनेक राज्य आणि केंद्रीय संस्था युद्धपातळीवर काम करत होत्या. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मालगाडीचा चालक आणि सहचालकाचाही मृतांमध्ये समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. मदत व बचावकार्याअंती कांचनजंगा एक्स्प्रेसने दुपारी 12.40 वाजता अपघातस्थळ सोडले आणि रात्री 8 वाजता सियालदाहला दाखल झाली होती, असे पूर्व रेल्वेचे सीपीआरओ कौशिक मित्रा यांनी सांगितले.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना दुर्घटनेबाबत खेद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये ‘पश्चिम बंगालमधील रेल्वे दुर्घटना दु:खद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना.’ असे ट्विट केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या अपघाताबाबत खेद व्यक्त केला आहे. त्यांनी बचाव, मदत आणि वैद्यकीय मदतीसाठी जिल्हा दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, डॉक्टर, ऊग्णवाहिका आणि आपत्ती पथके घटनास्थळी पाठवली आहेत.

नेमके कारण अस्पष्ट

प्रथमदर्शनी मालगाडीच्या इंजिनचालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, सिग्नलमधील बिघाडामुळे हा अपघात घडल्याचा दावाही केला जात आहे. सध्या रेल्वे विभागाकडून नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नसले तरी दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिग्नलिंग सिस्टीममध्ये काही अडचण आली की नाही याची पुष्टी झालेली नाही किंवा एकाच ट्रॅकवर दोन गाड्या एकमेकांच्या इतक्मया जवळ कशा आल्या, याचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

रेल्वेमंत्री घटनास्थळी, आर्थिक मदतीची घोषणा

दुर्घटनेनंतर मदतकार्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पश्चिम बंगालला दाखल झालेल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पीडितांना मदतीची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख ऊपये, गंभीर जखमींना 2.50 लाख ऊपये आणि किरकोळ जखमींना 50,000 ऊपये दिले जातील, असे स्पष्ट केले. या अपघाताने एका वर्षापूर्वी ओडिशातील बहनगा मार्केटजवळ झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेस अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या अपघातात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते.

लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा प्रभावित

अपघातामुळे उत्तर बंगाल आणि देशाच्या ईशान्य भागातील लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा प्रभावित झाल्या होत्या. दोन गाड्या धडकल्यामुळे अपघातस्थळी ट्रॅक उखडला गेल्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या त्यांच्या सामान्य मार्गाऐवजी सिलीगुडी-बागडोगरा-अलुआबारी भागातून वळवण्यात आल्याचे कोलकाता येथील पूर्व रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्ग वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये गुवाहाटी-सरायघाट एक्स्प्रेस, गुवाहाटी-बेंगळूर एक्स्प्रेस, एनजेपी-हावडा वंदे भारत, कामरूप एक्स्प्रेस आणि उत्तरबंगा एक्स्प्रेसचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.