15 भारतीयांची ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी
चार्टर्ड फ्लाइटने परत पाठविले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियातून 15 भारतीयांना डिपोर्ट करण्यात आले आहे. हे सर्व लोक एका विशेष चार्टर्ड फ्लाइटद्वारे दिल्लीतील विमानतळावर पोहोचले. यातील 9 जण पंजाबचे तर एक व्यक्ती हैदराबादचा रहिवासी आहे. विमानतळावर विमान लँड होताच या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंजाब पोलीस अधिकाऱ्यांची एक टीम 9 जणांना स्वत:च्या राज्यात परतली आहे.
ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी करण्यात आलेल्या भारतीय नागरिकांचे वय 25-45 वर्षांदरम्यान आहे. यातील 9 जण पंजाबचे असुन ते मोगा, खन्ना, जालंधर, होशियारपूर, नवांशहर, तरनतारन, गुरदासपूर, रोपड आणि फिरोजपूल जिल्ह्यातील आहेत. तर हरियाणा आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी एक तर दोन जण तेलंगणातील आहेत.
संबंधित लोकांचे दस्तऐवज तयार कसे झाले आणि याप्रकरणी त्यांना कुणी मदत केली याचा शोध घेतला जाणार आहे. गरज भासल्यास विदेश मंत्रालयाशी संपर्क साधत याचा सोक्षमोक्ष लावण्यात येईल. या लोकांची प्रतिष्ठापूर्ण वापसी आणि समाजात त्यांना पुन्हा स्थान सुनिश्चित करण्यावर मुख्य जोर असेल. तसेच पलायनामागील समस्यांवर उपाय करण्यात येतील असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे.
डिपोर्ट करण्यामागील मुख्य कारण
गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असणे, व्हिसा नियमांचे उल्लंघन करणे किंवा अधिकाऱ्यांसोबत सहकार्य न केल्यामुळे या भारतीयांची ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 15 पैकी केवळ 2 जणांकडे वैध पासपोर्ट होता, उर्वरित लोकांना भारतात परत पाठविण्यासाठी ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासाकडून ‘आपत्कालीन प्रमाणपत्र’ जारी करण्यात आले, जे केवळ एकतर्फी प्रवासासाठी मान्य असते.
विशेष चार्टर्ड फ्लाइडचा वापर
या भारतीयांना परत पाठविण्यासाठी ‘नौरू एअरलाइन्स’च्या विशेष चार्टर्ड विमानाचा वापर करण्यात आला. अधिकाऱ्यांनुसार या भारतीयांकडून धोका असल्याने त्यांना सामान्य प्रवासी विमानातून पाठविण्यात आले नव्हते. या विशेष विमानात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी होते.