दिल्लीत 15 परदेशी नागरिकांना अटक
व्हिसाशिवाय वास्तव्य करणाऱ्यांना दणका
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
भारतातील विविध राज्यांमध्ये बेकायदेशीर परदेशी नागरिक आणि घुसखोरांविरुद्ध सतत कारवाई सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. त्याच क्रमाने, पोलिसांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत 15 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. दिल्लीतील मोहन गार्डन आणि उत्तम नगर भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत 15 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आल्याची माहिती सोमवारी देण्यात आली. बांगलादेशींव्यतिरिक्त अटक केलेल्या परदेशी नागरिकांमध्ये 12 नायजेरियन आणि आयव्हरी कोस्टच्या एका नागरिकाचा समावेश आहे. हे परदेशी नागरिक वैध व्हिसाशिवाय भारतात राहत होते. आता या सर्व परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवले जाणार असल्याचे सोमवारी दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दिल्लीतील मोहन गार्डन आणि उत्तम नगरमधील कारवाईदरम्यान सदर विदेशी नागरिक वैध व्हिसाशिवाय निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ भारतात राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या सर्व बेकायदेशीर परदेशी नागरिकांना पकडून डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले आहे. पडताळणीनंतर फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशनने त्या सर्वांना त्यांच्या देशात पाठवण्याचे आदेश दिले आहेत.