पाऊस-वादळामुळे गुजरातमध्ये 14 बळी
बिहारमध्येही पाच जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या मध्यवर्ती आणि उत्तर भागात सध्या पाऊस आणि वादळाचा तडाखा सुरू आहे. गुजरातमध्ये वादळामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारीही राज्यातील अनेक जिह्यांमध्ये वादळ आणि पाऊस पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच बिहारमध्ये पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
हवामान विभागाने बुधवारी देशातील 26 राज्यांमध्ये वादळ आणि वादळाचा इशारा जारी केला होता. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. बिहारमध्ये वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी राज्याच्या अनेक भागात 70 ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू लागल्यामुळे बऱ्याच भागात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत मध्यप्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये पाऊस आणि जोरदार वादळे आली. बुधवारीही 9 जिह्यांमध्ये गारपीट आणि 34 जिह्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस आणि गडगडाट झाला.