दोन गटातील गोळीबारात मणिपुरात 13 जणांचा मृत्यू
म्यानमार सीमेजवळील लीथू गावात घटना
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये सोमवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाला. ही घटना म्यानमार सीमेवरील कुकीबहुल भागात असलेल्या तेंगनौपाल जिल्ह्यातील लीथू गावात घडली. आसाम रायफल्सच्या म्हणण्यानुसार, तेथील एका गटाने म्यानमारला जाणाऱ्या बंडखोरांवर हा हल्ला केला आहे. ठार झालेल्या लोकांची ओळख पटलेली नाही. गोळीबाराच्या या घटनेनंतर सदर भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी तपासही सुरू केला आहे.
मणिपूर सरकारने 3 डिसेंबर रोजी काही भाग वगळता राज्यातील मोबाईल इंटरनेट सेवा 18 डिसेंबरपर्यंत पुनर्संचयित केली होती. यानंतर गोळीबाराची ही पहिलीच घटना आहे. आरक्षणावरून कुकी आणि मैतेई गटांमध्ये 3 मेपासून राज्यात हिंसाचार सुरू आहे. हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत जवळपास 200 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 हजार लोक मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. राज्यातील अनेक भागात ठराविक भागात अजूनही तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याने सुरक्षा यंत्रणाही कमी करण्यात आलेली नाही. तणावग्रस्त भागामध्ये पोलिसांसह निमलष्करी दल तैनात असल्यामुळे सध्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवले जात आहे. मात्र, काही भागात अजूनही दोन गटातील संघर्ष निर्माण होण्याच्या घटना आजही घडताना दिसत आहेत.