युक्रेनजवळील हल्ल्यात 13 भारतीय अडकले
ड्रोन-क्षेपणास्त्रांद्वारे जहाजांवर सतत हल्ले : परराष्ट्र मंत्रालय यंत्रणांच्या संपर्कात
वृत्तसंस्था
कीव
युक्रेनच्या धोकादायक युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीय खलाशांचे प्राण धोक्यात आल्याचे आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. युक्रेनच्या चोर्नोमोर्स्क बंदरात नांगरलेल्या एका मालवाहू जहाजावर 13 भारतीयांसह एकूण 15 खलाशी अडकले आहेत. सततच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे या लोकांना मृत्यूच्या सततच्या धोक्याखाली जगावे लागत आहे. दरम्यान, फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाने या खलाशांची असहायता आणि दुर्दशा मांडत भारत सरकारला त्यांना लवकरात लवकर वाचवण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनच्या चोर्नोमोर्स्क बंदरात नांगरलेले ‘एमव्ही अमीर 1’ हे मालवाहू जहाज एक चालता-फिरता मृत्यूचा सापळा बनले आहे. फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक हृदयद्रावक पोस्ट शेअर केली आहे. जहाजावरील 13 भारतीयांसह 15 खलाशी सध्या एका गंभीर आणि जीवघेण्या परिस्थितीत अडकल्याचा दावा करण्यात आला आहे. गोळीबार आणि स्फोटांचे आवाज सर्वत्र घुमत असल्यामुळे या निष्पाप लोकांना सुटकेचा कोणताही मार्ग उरलेला नाही.
आकाशातून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव
जहाजाच्या अगदी जवळ ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले सतत होत आहेत. पुढच्याच क्षणी कोणताही स्फोट जहाजावर होईल असे वाटते. कोणते क्षेपणास्त्र किंवा ड्रोन थेट त्यांच्यावर आदळेल या भीतीने खलाशी सतत जगत आहेत. जहाजावरील प्रत्येकजण श्वास रोखून धरून आहे आणि कोणीतरी त्यांना या नरकातून वाचवेल अशी आशा करत असल्याचेही सांगितले जात आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कडक इशारा
ही घटना उघडकीस येण्याच्या केवळ एक दिवस आधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनकडे आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. भारताने काळ्या समुद्रात काम करणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याचा हवाला देत युक्रेनचे नवी दिल्लीतील राजदूत डॉ. ओलेक्झांडर पोलिशचुक यांना पाचारण केले होते. ओडेसा बंदराजवळ चार भारतीय कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ‘एमव्ही ओमोर्फी’ या मालवाहू जहाजावर हल्ला झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.