Ratnagiri : शिक्षा संपताच 13 बांगलादेशींना मायदेशी पाठवणार, SP धनंजय कुलकर्णी यांची माहिती
13 जणांना बांगलादेश-भारताच्या सीमेवरील सुरक्षा यंत्रणेच्या (BSF) ताब्यात दिले जाईल
रत्नागिरी : तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव करणाऱ्या 13 बांगलादेशींना न्यायालयाने ठोठावलेली 6 महिन्याची शिक्षा 14 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर 15 मे रोजी या सर्वांची बांग्लादेशात रवानगी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
तेरा जणांना बांगलादेश-भारताच्या सीमेवरील सुरक्षा यंत्रणेच्या (बीएसएफ) ताब्यात दिले जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाने 11 नोव्हेंबर 2024 ला मिळालेल्या माहितीवरून पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेल्या 13 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते.
याप्रकरणी केलेल्या चौकशीमध्ये त्या बांगलादेशीना भारतीय असल्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्याआधारे रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले. या प्रकरणाची गेल्या महिन्यात सुनावणी झाली होती. जिह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी 13 आरोपींना प्रत्येकी 6 महिने साधी कैद व 500 ऊपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
या 13 बांग्लादेशीय नागरिकांमध्ये वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजु अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा, अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अलीस यांचा समावेश आहे. बांग्लादेशात पाठवण्यासाठी लागणारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार आहे. शासकीय परवानगीनंतर पोलिसांचे एक पथक या 13 बांग्लादेशींना बीएसएफच्या ताब्यात देणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.