बारावी परीक्षा आजपासून परीक्षा
परीक्षा मंडळाकडून सज्जता : राज्यभरातून 7,10,363 विद्यार्थी देणार परीक्षा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात आजपासून बारावी परीक्षा-1 ला प्रारंभ होत आहे. परीक्षा काळात कॉपीसारखे कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा मंडळ सज्जता केली आहे. ही परीक्षा 17 मार्चपर्यंत चालणार असून 7,10,363 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. राज्यभरातील 1,217 केंद्रांवर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ही परीक्षा होणार आहे.
पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिका वाटपासाठीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवसापासून परीक्षा केंद्राभोवती 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. परीक्षा केंद्राभोवती असणारी झेरॉक्स दुकाने, सायबर सेंटर आणि संगणक दुकाने बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
मागील परीक्षांच्या काळात गैरप्रकारात सामील असलेल्यांवर पोलीस खाते लक्ष ठेवून आहे. परीक्षा होणाऱ्या सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस विभागाच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी वेबकास्टिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुख संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.
प्रश्नपत्रिका कोषागारातून परीक्षा केंद्रांवर पाठवताना कडक पोलीस सुरक्षा व्यवस्था पुरविली जाईल. तसेच त्याचे चित्रिकरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका नियोजित वेळेच्या आधी कोषागारातून बाहेर काढली जाणार नाही. अशी घटना घडल्यास जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. परीक्षा केंद्रातील विद्यार्थी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी मोबाईल, टेलिफोन वापरावर निर्बंध आहेत.