भारतीय संघाला बीसीसीआयकडून 125 कोटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने शनिवारी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिकंल्यानंतर या संघातील खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) विजेत्या भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सदर घोषणा मंडळाचे सचिव जय शहा यांनी केली.
ब्रिजटाऊन बार्बाडोस येथे शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी थरारक पराभव करत विश्वचषकावर आपले दुसऱ्यांदा नाव कोरले. या स्पर्धेत भारतीय संघाने शेवटपर्यंत सलग विजयासह जेतेपद हस्तगत केले. या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला. शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कोट्यावधी भारतीय क्रिकेटशौकिनांचे स्वप्न साकार केल्याने प्रत्येक भारतीय नागरिकाला याचा अभिमान वाटतो. या संपूर्ण स्पर्धेत संघातील प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करुन जेतेपदाला आपला हातभार लावला.