शेतकऱ्यांसाठी नवी 109 वाण उपलब्ध
उत्पन्न वाढवण्यास होणार मदत : हवामान अनुकूल आणि जैव-फोर्टिफाईड 61 पिकांची बियाणी जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवामान बदलामुळे सध्या भारतीय शेतीला मोठा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे 109 नवीन वाण जाहीर केली. विशेष म्हणजे हे सर्व वाण उच्च उत्पन्न देणारी वाण असल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) परिसरात नैसर्गिक शेतीसह सेंद्रिय अन्नाच्या वाढत्या गरजेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. तसेच 61 पिकांच्या 109 नवीन वाणांची शिफारस त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी केली आहे. या न्व्या जातींमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न घेणे शक्मय होणार आहे.
पंतप्रधान मोदींनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 उच्च उत्पादन देणाऱ्या हवामानास अनुकूल आणि जैव-फोर्टिफाईड वाणांचे प्रकाशन केले. यावेळी पंतप्रधानांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. या नवीन पिकांच्या वाणांच्या महत्त्वावर चर्चा करताना पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रात मूल्यवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 61 पिकांच्या 109 वाणांमध्ये 34 शेती पिके आणि 27 बागायती पिके आहेत. शेती पिकांमध्ये बाजरी, चारा पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, फायबर आणि इतर पिकांसह तृणधान्य बियाण्यांचा देखील समावेश आहे. तर बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाजीपाला, लावणी पिके, कंद पिके, मसाले, फुले व औषधी पिके यांचा समावेश आहे. ही नवीन वाण अत्यंत फायदेशीर ठरणार असल्याने खर्च कमी होऊन पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधानांची शेतकरी, वैज्ञानिकांशीही चर्चा
पंतप्रधान मोदींनी बाजरीच्या महत्त्वावर चर्चा केली आणि लोक पौष्टिक आहाराकडे कसे वाटचाल करत आहेत हे अधोरेखित केले. नैसर्गिक शेतीचे फायदे आणि सेंद्रिय शेतीबद्दल सर्वसामान्यांचा वाढता विश्वास याविषयीही त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. लोकांमध्ये सेंद्रिय अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले असून त्यांची मागणीही वाढत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. याप्रसंगी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. शेतकऱ्यांनीही कृषी विज्ञान केंद्रांनी जनजागृतीसाठी घेतलेल्या भूमिकेची प्रशंसा केली. दर महिन्याला विकसित होणाऱ्या नवीन वाणांच्या फायद्यांबाबत शेतकऱ्यांना सक्रियपणे माहिती द्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. या नवीन पिकांच्या जाती विकसित केल्याबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचेही कौतुक केले.
कृषी उद्योजकतेचे नवीन मार्ग खुले...
शाश्वत शेती आणि हवामान-अनुकूल पद्धतींचा अवलंब करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी पिकांच्या मजबूत वाणांना प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी भर दिला आहे. या पावलांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि त्यांच्यासाठी उद्योजकतेचे नवीन मार्ग खुले होतील, असा आशावाद याप्रसंगी व्यक्त केले.
रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर
अधिक उत्पादन देणाऱ्या 109 वाणांचे प्रकाशन करण्याचे पाऊल हे आधुनिक शेतीच्या दिशने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम प्रणाम (पीएम प्रमोशन ऑफ अल्टरनेटिव्ह न्यूट्रिशन फॉर अॅग्रीकल्चर मॅनेजमेंट) योजना सुरू केली आहे.