‘सौरकृषी’ योजनेतून 102 मेगावॅट सौरऊर्जेची निर्मिती
कोल्हापूर :
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून कोल्हापूर परिमंडलमध्ये 102 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यातंर्गत कोल्हापूर जिल्ह्यात नऊ तर सांगली जिल्ह्यात 11 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामधून दोन्ही जिल्ह्यातील 34 हजार 161 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या 16 हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील कोल्हापूर व सांगली जिह्यातील हे 20 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामुळे कोल्हापूर जिह्यातील 29 तर सांगली जिह्यातील 39 कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरु झाला आहे.
- जिल्ह्यातील 13 हजार शेतकऱ्यांना लाभ
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 54 ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता 170 मेगावॅट आहे. यापैकी नऊ प्रकल्प कार्यान्वित झाले असून यांची एकत्रित क्षमता 32 मेगावॅट आहे. यामध्ये हरोली, आळते, सातवे, किणी, हरळी बुद्रुक, नरंदे-तासगाव, कोळगाव, दुंडगे या प्रकल्पांचा समावेश होतो. या प्रकल्पामुळे कोल्हापूर जिह्यातील 13,135 शेतकऱ्यांना शेतीकरता दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
- सांगलीत 21 हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज
सांगली जिह्यात 34 ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण क्षमता 207 मेगावॅट आहे. यापैकी 11 प्रकल्प कार्यान्वित झाले असून यांची एकत्रित क्षमता 70 मेगावॅट आहे. यामध्ये बसरगी, मणेराजुरी, माडगुळे, जिरग्याळ, लिंगीवरे-पळसखेड, मोरबगी, उमदी-हळ्ळी, माडग्याळ, तिकोंडी, कोसारी या प्रकल्पांचा समावेश होतो. या प्रकल्पांमुळे सांगली जिह्यातील 21,026 शेतक्रयांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.
- सौर प्रकल्प उभारणीत जिल्हा प्रशासनाचे सहकार्य
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत दोन्ही जिह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी व त्यांच्या सर्व प्रशासकीय टीमचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. अशा सौर प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे.
- सौर प्रकल्प ग्राहक हिताचे
वीज ग्राहक, शेतकरी यांच्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प फायद्याचा असून यामुळे शेतीस दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी दूर होणार आहेत. योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होतील. दोन्ही जिह्यातील ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा. तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे.
- स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण