शहरात प्रधानमंत्री आवासमधून १ हजार घरे उभारणार
रत्नागिरी :
रत्नागिरी शहरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येणार असून १ हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधण्यात येणार आहेत. साळवी स्टॉप येथील सावंत यांच्या जागेवर हा प्रकल्प उभा करण्याचा संकल्प आहे. तसेच जिल्ह्यात आवास योजनेची ३३ घरे बांधून पूर्ण केली जातील, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दृकश्राव्य माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. शहरातील झोपडपट्टीधारकांनी सुमारे ८०० घरे असून त्यांना चांगली घरे देण्याचा शासनाचा विचार आहे. त्यासाठी शहरातील साळवी स्टॉप येथील सावंत यांच्या जागेमध्ये १ हजार घरांची उभारणी प्रधानमंत्री आवास योजनेतून केली जाणार आहे. रत्नागिरी शहर हे झोपडपट्टीमुक्त करण्यात येणार आहे. तसेच शहरालगतच्या गावामध्ये घनकचरा प्रकल्पही लवकरच उभारले जातील, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून १८ हजार ४१४ घराचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी १८ हजार ५०५ घरांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी ३८१ घरे पूर्ण झाली असून १५ हजार ३२३ घरांना पहिला हप्ता देण्यात आला असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच २०१६-२२ मध्ये ९ हजार ६१५ घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यामधील ९ हजार ५७२ घरे पूर्ण झाली आहेत. तर अनुसूचित जातीसाठी ९४८ व अनुसूचित जमातीची २६५ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी समाजासाठी मोदी आवास योजना राबवण्यात येत असून ६ हजार ३५६ घरे मंजूर झाली असून त्यापैकी ४ हजार १८४ घरे बांधून पूर्ण झाल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले.
- पावसामुळे मृत्यू झालेल्या दोघांना मदत
पावसामुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील दोघांना ८ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. पाच शाळा, एक अंगणवाडी, १२ संरक्षक भिती आदींचेही नुकसान झाल्याचे सामंत यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील ध्यान मंदिरही उभारण्यात येत असून राज्यातील सर्वाधिक उंचीची बुद्धांची मूर्ती या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ग्रंथालयासाठी ८ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आले असल्याचे सामंत यांनी सांगितले.
- मंडणगड न्यायालय इमारत उद्घाटनाला सरन्यायाधीश येणार
मंडणगड न्यायालयाच्या इमारतीचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. या इमारतीच्या उद्घाटनाला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे उपस्थित राहणार असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
- शहरातील १७३ होर्डीग हटविली
शहराच्या सौंदर्यकरणात बाधा ठरणारी होर्डीग हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २९२ पैकी १७३ होर्डीग हटविण्यात आली आहेत. उर्वरित ११९ होर्डीगही हटविली जातील. मात्र काही ठिकाणी व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने त्यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल. त्याप्रमाणे मुख्य रस्त्यावरीलही होर्डीग हटविली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.