100 दिवसांचा सुधारणा उपक्रमात कोकण भारी!, डॉ. विजय सुर्यवंशी ठरले अव्वल विभागीय आयुक्त
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार
मुंबई : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या मुख्यमंत्री 100 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार मिना यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘100 दिवसांचा सुधारणा उपक्रम’ हा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला होता. हा उपक्रम ५ डिसेंबर २०२४ रोजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुरू झाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे, शासकीय सेवांचा दर्जा सुधारणे आणि जनतेच्या समस्यांचे त्वरित निराकरण करणे हा होता.
या १०० दिवसांत राज्यातील सर्व ४८ शासकीय विभागांना विशिष्ट लक्ष्ये देण्यात आली होती. ज्यामध्ये प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे, डिजिटलायझेशन, जलप्रदूषण नियंत्रण, स्वच्छता आणि जनजागृती यांसारख्या क्षेत्रांचा समावेश होता. मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमात विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभाग राज्यात प्रथम आला. डॉ. सुर्यवंशी यांनी प्रशासकीय सुधारणा या उपक्रमांतर्गत शासकीय प्रक्रिया सुलभ करणे, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आणि पारदर्शकता वाढवणे यावर भर दिला.
डिजिटलायझेशन करत शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध करून पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. जलप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कोकणसारख्या भागात समुद्रकिनारी आणि नद्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. कोकण विभागात स्वच्छता, जलसंवर्धन आणि जलजन्य आजारांचे धोके याबाबत स्थानिकांना शिक्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले. मागील आठवड्यात क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया या स्वायत्त संस्थेने या कामगिरीचे मूल्यांकन केले होते. यात राज्यातील सर्व सहा विभागात कोकण विभागाने बाजी मारली आहे.